मुंबई – विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरुध्द अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांनी वकीलामार्फत मानहानीच्या दाव्यासाठी लिगल नोटीस पाठवली आहे. त्याबाबत मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक-खान यांनी ट्विट करत नोटीसची कॅापी सुध्दा पोस्ट केली आहे. राज्याच्या राजकारणात सध्या मलिक आणि फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात जावई समीर खान यांनी आता मानहानीचा दावा दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे. निलोफर मलिक-खान यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, खोटे आरोप जीवन उध्वस्त करतात. एखाद्याने आरोप करण्यापूर्वी किंवा निंदा करण्यापूर्वी ते कशाबद्दल बोलत आहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे. ही बदनामी नोटीस खोटे दावे आणि विधानांसाठी आहे जे श्री. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या कुटुंबावर केले आहे. आम्ही मागे हटणार नाही. असे म्हटले आहे. याबाबत नवाब मलिक यांनी सुध्दा आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली, ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या जावयाबाबत काही आरोप लावले होते. त्यात त्यांनी समीर खान यांच्या घरात ड्रग्ज सापडल्याचे सांगितले. पण, हे खोटे आहे. त्यामुळे आम्ही मानहानीचा दावा दाखल करणार आहोत. आज आम्ही नोटीस पाठवली आहे.