मुंबई – जगप्रसिद्ध गानसम्राज्ञी, भारताची गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज (२८ सप्टेंबर) रोजी ९२ वा वाढदिवस साजरा होत आहे. लता दीदी यांनी हिंदी सिनेमाची हजारो गाणी गायली असून एकदा कोणी त्याची गाणी ऐकली की पुन्हा पुन्हा तीच गाणी ऐकायची इच्छा होत असते. लता मंगेशकर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक संस्मरणीय गाणी दिली आहेत. वाढदिवसा निमित्ताने त्या आपल्या चाहत्यांसाठी खास भेट घेऊन आल्या आहेत. लता दीदी यांचे २२ वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलेले ‘सब ठीक है लेकिन, सब ठीक नहीं लगता’ हे गाणे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज रिलीज होत आहे.
वास्तविक हे गाणे एका चित्रपटात चित्रित केले जाणार होते. पण तो चित्रपट कधीच तयार झाला नाही. एका चित्रपटापूर्वी हे गाणे रेकॉर्ड करण्यात आले. या गाण्याचे बोल गुलजार साहब यांनी लिहिले होते, तर या गाण्याला संगीत दिग्दर्शक आणि संगीतकार विशाल भारद्वाज यांनी संगीतबद्ध केले होते. लताजींच्या आवाजात गायलेल्या या गाण्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे गाणे आजच्या काळानुसार रीमिक्स केले गेले नाही किंवा गाण्यात कोणताही बदल झाला नाही.
विशेष म्हणजे लता मंगेशकर यांनी २२ वर्षांनंतर हे गाणे प्रदर्शित होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. दीदी म्हणाल्या की,’संगीत हे माझे जीवन असून आतापर्यंत मी गात आहे. विशाल भारद्वाज आणि गुलजार जी यांनी लिहिलेली गाणी अतिशय मधुर आणि चांगली आहेत. विशाल भारद्वाज जींनी त्या काळात केलेली गाणी खूप चांगली होती. तर गुलजार जी यांचे पहिले गाणे ‘ए हवा’ आणि दुसरे ‘पाणी-पानी रे खरे पाणी रे’ हे मी गायले होते. त्यांची सर्व गाणी खूप चांगली होती, एक गाणे ‘ए हवा’ काढण्यात आले कारण परिस्थिती वेगळी होती’.
विशाल भारद्वाज आणि गुलजार जीं सोबत आणखी एका चित्रपटाबद्दल लता मंगेशकर म्हणाल्या, ‘त्यानंतर आम्ही एका चित्रपटासाठी एक गाणे केले. हे गाणे गुलजार जी यांनी लिहिले होते आणि संगीत विशाल जी यांचे होते, हे गाणे होते ‘सब ठीक है लेकिन सब ठीक नहीं लगता’, पण तो चित्रपट तयार झाला नाही. त्यानंतर विशाल जीने गुलजारजींशी बोलले, आता आज ते गाणे रिलीज करत आहे. मला आशा आहे की श्रोत्यांना हे गाणे आवडेल, त्याचे बोल आणि सूर ही आवडतील. कारण विशाल भारद्वाज खूप चांगला संगीतकार आहे.
लताजींची स्तुती ऐकून विशाल भारद्वाज खूप खूश झाले. त्यांना लताजींनी दिलेल्या प्रतिक्रीयेबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी उत्तर दिले, ‘लताजींच्या तोंडून स्तुती ऐकल्यानंतर मला वाटते की, माझे पाय आता जमिनीवर राहिले पाहिजेत, तसेच माझ्यासाठी एक मोठे व चांगले काम आहे. विशाल भारद्वाज यांनी लताजींसोबत त्यांच्या पहिल्या भेटीच्या आठवणीही शेअर केल्या. ते म्हणाले, ‘जेव्हा मी मुंबईत आलो, तेव्हा माझे स्वप्न होते की, मी गुलजार साहेबांसोबत एक गाणे करावे आणि ते गाणे लताजींनी गायले असेल आणि मला त्यांना भेटण्याची संधी मिळेल’.
दरम्यान, या गाण्याबद्दल बोलताना गुलजार जी म्हणाले, ‘आजच्या काळात रसिक या गाण्याशी स्वतःला जोडू शकले ही चांगली गोष्ट आहे. येथे प्रत्येक संगीत आणि शब्द त्याचे युग घेऊन येतात.