इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी २२१५ कोटी रुपये मदत दिल्याचे सांगितले आहे.
भागाकार केला तर प्रत्येक शेतकऱ्याला यानुसार ७ हजार रुपयाची मदत मिळणार आहे. एक एकर शेत नांगरण्याचा खर्च सुद्धा यापेक्षा जास्त असल्याचे अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ अजित नवले यांनी सांगितले.
डॉ. नवले पुढे म्हणाले की, अतिवृष्टीने हाता तोंडाशी आलेली पिके बरबाद झाली आहेत. गोठे पडले आहेत. जनावरे वाहून गेलेली आहेत. शेती खरवडून गेलेली आहे. शेतमजुरांचा रोजगार संपुष्टात आलेला आहे. अशा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना ७ हजार रुपये मदत देणे हे त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे. सरकारने याचा पुनर्विचार करावा. निकष अटी व शर्तींच्या पलीकडे जात मानवतेच्या भावनेने भरीव मदत शेतकऱ्यांना करावी. प्रति एकर किमान ५० हजार रुपये मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व श्रमहानी मोबदला म्हणून शेतमजुरांना प्रति कुटुंब तातडीची २५ हजार रुपयाची मदत सरकारने जाहीर करावी अशी मागणी किसान सभेच्या वतीने त्यांनी केली.