इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मोठ्या गॅपनंतर चला हवा येऊ द्या हा शो झी मराठीवर पुन्हा सुरु होत आहे. पण, या शोमध्ये निलेश साबळे एेवजी सूत्रसंचालन अभिजीत खांडेकर करणार आहे. त्यामुळे राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी निलेश साबळेवर सोशल मीडियात पोस्ट करत टीका केली. त्यानंतर त्याला निलेश साबळे यांनी एक व्हिडिओ टाकत उत्तर दिले.
पण आता अभिनेता किरण माने यांनी एक पोस्ट फेसबुकला टाकली असून ती सध्या चर्चेत आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे. की, निलेश साबळे, मी तुला तुझ्या अगदी सुरुवातीच्या स्ट्रगलच्या काळापासून ओळखतोय. तू कसा आहेस याचं स्पष्टीकरण द्यायची तुला काहीही गरज नाहीये. तू जे मिळवलं आहेस त्यामागे अफाट कष्ट आहेत. प्रामाणिकपणा आहे. कामावरची निष्ठा आहे. ‘इतरांकडे नसलेलं ज्ञान आपल्याकडे आहे’,असं भासवून ज्यांनी आयुष्यभर लोकांना भुलवण्याचे उद्योग केले त्यांनी केलेली टीका आपण किती आणि का मनाला लावून घ्यायची???
तुकोबाराया सांगून गेले आहेत,
“सांगो जाणती शकुन । भूत भविष्य वर्तमान ।।
त्यांचा आम्हांसी कंटाळा । पाहो नावडती डोळां ।।”
कुणाच्या वल्गनांना किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवायला हवं. तू तुझ्या करीयरमधल्या वेगळ्या टप्प्यावर आहेस. तू आता सुत्रसंचालक हा शिक्का पुसून ‘अभिनेता’ म्हणून स्वत:ची ओळख करून देण्यासाठी सज्ज होतो आहेस. तुला मनापासून शुभेच्छा. जीव लावून काम कर. यश तुझेच आहे. टीकाकारांना उंच कोलून टाक… आणि म्हण, “ए चल्… हवा येऊ दे” खुप शुभेच्छा मित्रा…किरण माने.