नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- यावर्षीच्या रब्बी हंगामामध्ये महाराष्ट्रातील कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा लागवड झालेली असून आता थोड्या प्रमाणात कांदा काढणीला सुरुवात झाली आहे एप्रिल व मे महिन्यामध्ये कांदा काढणीला अजून गती येणार असून अतिरिक्त कांदा उत्पादन होऊन यापेक्षा जास्तीची कांदा आवक होऊन कांदा दरात यापेक्षाही कमी होण्याची शक्यता आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला उन्हाळी व लाल या दोन्ही प्रकारातील शेतकऱ्यांच्या कांद्याला राज्यातील बाजार समित्यांमध्ये प्रतिक्विंटल सरासरी हजार ते बाराशे रुपये इतका निचांकी दर मिळत आहे. या दरात शेतकऱ्यांचा कांद्याचा उत्पादन खर्चही भरून निघणार नाही. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून तत्काळ कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क शून्य करून घ्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सदर मागणीचे पत्र आज मेल द्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे नाशिक जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे यांनी दिली आहे.