कळवण – नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील तांत्रिक अनुशेष अजूनही भरून निघालेला नसल्याने तो भरून काढण्यासाठी कळवण येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन सुरु करावे या आमदार नितीन पवार यांच्या मागणीला यश आले आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालय परिसरातील जलसंपदा विभागाकडील व आय टी आय परिसरातील वसतिगृह, कर्मचारी निवास परिसरातील जागेची समिती सदस्यांनी पाहणी करुन हिरवा कंदील दिला आहे .
तत्कालीन कळवणचे आमदार स्व.ए टी पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौं जयश्री पवार यांनी या संदर्भात राज्यपाल, राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करुन मागणी केल्याने त्याची दखल घेऊन तंत्रनिकेतन विभागाचे सचीव डॉ सुभाष महाजन यांनी या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देऊन जागेची पाहणी करण्यासंदर्भात आदेश दिले होते. तत्कालीन समितीच्या सदस्यांनी या संदर्भात तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी डी गंगाधरण यांची भेट घेऊन जागेची मागणी केली असता ती त्यांनी धुडकावून लावल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला नव्हता.गेल्या पंचवार्षिकमध्ये ही मागणी मागे पडली.प्रलंबित असलेल्या या मागणीचा आमदार नितीन पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार,तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा केल्याने पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश तंत्रशिक्षण विभागाला दिले आहे.
या संदर्भात शासकीय समितीचे सदस्य जी सी खुरसाडे, एन एल पाटील, आर एस शुक्ल यांनी परिसरातील जागेची पाहणी करुन मानूरचे तलाठी बच्छाव, जलसंपदा विभागाचे घोडे यांच्याकडून माहीती घेऊन पाहणी करुन तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालय, विद्यार्थी वसतिगृहसाठी जागा योग्य असल्याचे सांगून वरिष्ठ कार्यालयात जागा निश्चितीचा अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले. कळवण ,सुरगाणा ,बागलाण ,देवळा ,पेठ ,इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर ह्या नाशिक जिल्ह्यातील आदिवासी तालुक्याचा तांत्रिक अनुशेष बाकी असून अजूनही भरलेला नाही ,कळवण येथे एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आहे ,आदिवासी बांधव समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना राबविल्या जातात ,शिक्षणविषयक विविध योजनाद्वारे शासकीय आश्रमशाळा व वसतिगृह ही समूह योजना कळवण प्रकल्प कार्यालय अंतर्गत सात तालुक्यात राबविली जाते ,प्राथमिक व माध्यमिक सुविधा असल्याने सदर शिक्षण पूर्ण केल्यानंतर बहुतांशी विद्यार्थी ,विद्यार्थिनी यांना व्यावसायिक शिक्षणासाठी मुंबई ,पुणे आणि नाशिक तसेच महाराष्ट्रातील प्रगत असलेल्या वेगवेगळ्या शहरात जावे लागते हे आमदार नितीन पवार यांनी
उपमुख्यमंत्री अजित पवार,तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून दिले. आदिवासी तालुक्यातील बहुतांशी आदिवासी विद्यार्थी हलाखीचे जीवन जगत असून त्यांच्याजवळ शैक्षणिक गुणवत्ता आहे पण केवळ घरातील आर्थिक परिस्थितीमुळे तांत्रिक व उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होत नसल्याने तांत्रिक शिक्षणापासून वंचित राहतो ,नाशिक विभागातील आदिवासी तालुक्यातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी ,उच्च व तंत्रशिक्षण उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने व आदिवासी भागाचा अनुशेष भरून निघण्यासाठी कळवण येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन सुरु करण्यास खास बाब म्हणून मंजुरी देण्याची विनंती आमदार नितीन पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार,तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे ,आदिवासी भागाचा तांत्रिक अनुशेष भरून निघालेला नसल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना कळवण येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन सुरु करण्याबाबत तत्काळ योग्य कार्यवाही करून झालेल्या कार्यवाहीचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे सुचित केले आहे