कळवण – कळवण तालुक्यात ई – पीक पाहणीचा प्रयोग यशस्वीरित्या सुरू झाला असून शेतकऱ्यांना डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारे देण्यात आल्यामुळे या उताऱ्यांवरून कोणत्या शेतकऱ्याने किती क्षेत्रावर कोणते पीक घेतले आहे याची ई – पीक माहिती प्रशासनाला समजणार असल्यामुळे ई पीक पाहणीला कळवण तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यात सर्वाधिक नोंदणी कळवण तालुक्यात झाली आहे.ही ई पीक पाहणी शेतकऱ्यांना व कृषी विभागाला कृषी योजनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील 14 लाख 38 हजार 541 खातेदार शेतकऱ्यांपैकी 75 हजार 526 खातेदारांनी नोंदणी केली 15 तालुक्यात कळवण तालुक्यात सर्वाधिक 9004 खातेदार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात कळवण (9094)दिंडोरी (1618), बागलाण (4241), नांदगाव (2935), येवला (4274), सुरगाणा ( 4026), पेठ (5182), इगतपुरी (4742), त्र्यंबकेश्वर (8596), देवळा ( 2578), मालेगाव (7739), चांदवड (3418)नाशिक (5997), निफाड (6224)सिन्नर (4951) अशी 75 हजार 526 खातेदार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
तहसीलदार कापसे शेताच्या बांधावर पोहोचले –
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांची नोंद सातबारावर स्वत: करून घेता यावी, यासाठी शासनाने ‘ई पीक पाहणी अॅप’ सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या सातबारावर पिकांची नोंद घेण्यास होणारा विलंब किंवा चुकीच्या पिकाची नोंद झाल्यामूळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यास हे अॅप उपयुक्त ठरणार आहे. या अॅपबाबत विविध समस्या शेतकऱ्यांना जाणवत असल्याच्या तक्रारी आहे. त्याची खातरजमा करून घेण्यासाठी कळवणचे तहसीलदार बी ए कापसे यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन थेट शेताच्या बांधावर पोहचले.नांदुरी, गोबापूर, कातळगाव, आठबे, साकोरे, कळवण, कळवण खुर्द, भेंडी, बगडू येथील शेतकऱ्याच्या भेटी घेऊन शेतातील पिकांची नोंद अॅपमध्ये करून दाखविली.
ई पीक नोंदणी योजना –
या योजनेमुळे नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्ती किंवा दुष्काळात पीक विमा वा अन्य मदत देताना या माहितीचा फायदा होणार आहे . जमिनीचा महसुली लेख ठेवण्यासाठी पारंपरिक पद्धतीने गाव नमुने , दुय्यम नोंदवह्या तयार करण्याचे काम सुरू असते . सातबारा उताऱ्यावर संबंधित शेतकऱ्याच्या जमिनीचे क्षेत्रफळ , उत्पन्न , सर्वसाधारण पीक यांची नोंद असते . दुष्काळ , अवकाळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास आणि पीकविमा काढलेला असल्यास महसूल विभागाकडून गाव किंवा गट क्रमांकाद्वारे सर्वेक्षण केले जाते . ही पद्धत खर्चिक आणि वेळखाऊ आहे . तसेच किती क्षेत्रावर कोणते पीक घेण्यात आले आहे , याचा निश्चित अंदाज लावता येत नाही . परिणामी पिकांची यादी प्रशासनाला शेतकरीनिहाय उपलब्ध होत नाही . शेतकऱ्यांना स्वत : च्या शेतातील पिकांची सात बारामध्ये स्वत : नोंद करता येणार असल्याने पीक पेरणी आणि पिकांच्या परिस्थितीचा अंदाज करता येणार आहे . ई – पीक पाहणी प्रकल्पामुळे गाव , तालुका आणि जिल्हानिहाय प्रत्येक पिकाचे क्षेत्र समजणार आहे . शेतीसाठी पीक कर्ज आणि पीक विमा सुलभरित्या उपलब्ध होण्यास मदत होणार आहे .
आर्थिक पाहणी व कृषी नियोजनासाठी होणार मदत-
ई – पीक पाहणी हे पीक पेरणी अहवालाचा ‘ रियल टाइम क्रॉप डेटा ‘ संकलित होण्याच्या दृष्टीने या प्रक्रियेत पारदर्शकता आणणे , प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सहभाग मिळवणे , कृषी पतपुरवठा सुलभ करणे , नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई देणे यासाठी पीक पेरणीची माहिती शेतकऱ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे . ई – पाहणीमुळे राज्यातील पिकांचे क्षेत्र अचूक कळल्याने आर्थिक पाहणी व कृषी नियोजनासाठी मदत होणार आहे .
रिअल टाइम नोंदणी करण्याची सुविधा
शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्जही दिले जाते. मात्र दोन तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही, असा शेतकऱ्यांचा कायम आक्षेप होता. ही बाब लक्षात घेत आता महसूल विभागाने आपल्या पिकाची रिअल टाइम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे
शेतकऱ्यांचा प्रतिसाद अन नेटवर्कचा अडथळा –
ई – पीक पाहणीला शेतकरी चांगला प्रतिसाद देत आहेत . मात्र , नेटवर्क प्रॉब्लेम आणि संबंधित साईट स्लो चालत असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे
गोरख देवरे, शेतकरी , साकोरे
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ॲपचा वापर करावा
सर्व शेतकऱ्यांना मोबाइलवर प्ले स्टोअरमधून हे ॲप सहज घेता येते. या ॲपमध्ये सर्वांना समजेल, अशा मराठी भाषेत सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी आपल्या पिकाची नोंद घेऊ शकतो. पिकांचा फोटो काढून ते ॲपवर ‘अपलोड’ करू शकतात.जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ॲपचा वापर करावा. ज्यांना अडचणी येतील त्यांच्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केली जाईल.
-बी ए कापसे,
तहसीलदार, कळवण .