कळवण – मे २०२१ मध्ये तौक्ते चक्रीवादळाचा संपूर्ण राज्यासह कळवण, सुरगाणा तालुक्यात शिरकाव होऊन अनेक शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे व शेतपिकांचे तसेच घराची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कळवण व सुरगाणा तालुक्यातील घरांच्या नुकसानीची ८० लाख ५५ हजार रुपये तर शेतीपिकांच्या नुकसानीची ६ कोटी ५६ लाख रुपये मंजूर करण्यात आमदार नितीन पवार यांना यश आले. या नुकसान भरपाईचे धनादेश जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौं जयश्री पवार यांच्या हस्ते नांदुरी येथे नांदुरी, सप्तशृंगी गड, दरेगांव, मोहनदरी, कातळगाव,बिलवाडी, गोबापूर आदी परिसरातील लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसिलदार बंडू कापसे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.व्ही.पाटील उपसभापती विजय शिरसाठ, नांदुरी ग्रामपंचायत सरपंच सुभाष राउत, पंचायत समिती सदस्या पल्लवी देवरे, अतुल देवरे, किरण अहिरे,रघुनाथ महाजन आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौं जयश्री पवार यांनी सांगितले की मे २०२१ मध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे मतदार संघात झालेल्या नुकसानीची आमदार नितीन पवार यांनी पहाणी करून महसूल प्रशासनास पंचनामे करण्यास भाग पाडले, आदेश दिले होते. यावरही न थांबता मुख्यमंत्री उध्वजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न केल्यामुळे नुकसान भरपाई मिळाल्याने नुकसानग्रस्तांना दिलासा मिळाला असल्याचे सौं.पवार यांनी सांगितले. यावेळी अनिल राउत, शांताराम गवळी, सुनिता सोनवणे, पवन साबळे, जयराम मोरे, आकाश भोये, इंदुबाई पालवी, हिरामण चव्हाण, पंढरीनाथ कंवर, रघुनाथ महाले यांना नुकसान भरपाईचे धनादेश वितरीत करण्यात आले. नांदुरी बिरसा मुंडा मित्र मंडळास हिरडा, बेहडा, बाजा, कांचन, करंजी, बदाम या वन औषधी झाडांचे बीज वाटप सौं जयश्री पवार यांच्या हस्ते करण्यात येऊन आमदार नितीन पवार यांच्या संकल्पनेतून पर्यावरण ऱ्हास थांबविण्यासाठी वृक्ष लागवड करणे आवश्यक असल्यामुळे वृक्षारोपण करण्यात आले.