इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली येथील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या शुभहस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. पण, यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी खरंतर सर्वात जास्त राग मला यायला पाहिजे असे म्हटले आहे.
आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत म्हटले आहे की, आदरणीय शरद पवार साहेबांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचा सत्कार केला अन् त्यामुळे बराच गदारोळ माजला. आदरणीय पवारसाहेबांचा स्वभाव हा राजकारणातही आदर्शवतच आहे. ते कधीच वैयक्तिक द्वेष, सूड, आसुया मनातही ठेवत नाहीत. राजकीय – वैचारिक वैर ते सोडतही नाहीत. पण, कुणाबरोबर मंच सामाईक करणे त्यांनी आजवर टाळलेलेही नाही. अनेकांबरोबर त्यांचे वैचारिक मतभेद असले तरी वेगवेगळ्या कामांसाठी त्यांनी त्या – त्या माणसांसोबत जुळवून घेतले आणि त्यातून मार्ग काढला आहे. सगळ्याच मंचावर राजकारण मनात ठेवावे, असे मलाही गरजेचे वाटत नाही.
खरंतर सर्वात जास्त राग मला यायला पाहिजे; कारण, सर्वात जास्त छळ माझाच झाला आहे. निधी मिळत नाही, खोट्या पोलीस केसेस टाकल्या जातात. तरीही, आदरणीय शरद पवार साहेबांकडून सर्वांनीच शिकावे की, सूड, द्वेष आणि आसुया हे राजकारणात असताच कामा नये. आता लाखभर मतांनी जिंकलो असलो तरी हे सरकार आम्हाला निधी काही देणार नाही अन् ज्यांचे डिपॉझिट जाता-जाता वाचले, त्यांचा उदोउदो करून त्यांच्या नावाने निधी पाठवणार !
https://twitter.com/Awhadspeaks/status/1889951431483855085