इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्तामुळे राजकीय चर्चेला उधान आले आहे. दरम्यान भाजपचे मोठे नेते गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. जयंत पाटील हे पक्षामध्ये फार खूश आहेत असे मला वाटत नाही. कालांतराने बघू यामध्ये आता काय बदल होतोय का. माझ्या संपर्कात ते नेहमी असतात मात्र याबद्दल त्यांच्याशी कधी बोलणं झालं नाही असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, जयंत पाटील पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आहेत. जेष्ठ कार्यकर्ते आहेत. ते त्या पक्षातून बाहेर पडतील असे मला वाटत नाही. पक्ष सोडण्यासंदर्भात माझी त्यांच्याशी कधी चर्चा झाली नाही. जय़ंतराव मोठे नेते आहेत. त्यांना जर काही बोलायचे असेल तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी थेट बोलतील. असे त्यांनी सांगितले. आक्रमक राहण्यासारखा आता विरोधी पक्षांमध्ये काही राहिलेलं नाही असे त्यांनी सांगितले.
दरम्यान राष्ट्रवादीचे प्रवक्ते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटील साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारीत होणे, हा निव्वळ खोडसाळपणा आहे. पक्ष एका नियमानुसार अन् शिस्तीनुसारच चालत असतो असे म्हटले आहे.
एकीकडे जितेंद्र आव्हाड यांनी हे वृत्त फेटाळले असले तरी ज्यांच्या नावाची नवीन प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चा आहे. ते शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, प्रदेशाध्यक्षाबाबत अजून नाव निश्चित नाही. पवारसाहेब, सुप्रियाताई, जयंत पाटील आणि पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचे सांगितले. १५ तारखेला बैठक आहे. काही नावं चर्चेत आहेत. माझंही नाव चर्चेत असल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे दुसरीकडे रोहित पवार यांनी राजीनाम्याचे वृत्त मान्य केले आहे. नवीन प्रदेशाध्यक्ष १५ जुलै रोजी जाहीर होईल. ते नाव जयंत पाटील हेच जाहीर करतील असे म्हटले आहे.