विशेष प्रतिनिधी, मुंबई :
प्रसिद्ध गीतकार आणि पटकथालेखक जावेद अख्तर यांच्या काही वक्तव्याने यापूर्वी अनेक वाद निर्माण झाले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि तालिबान यांच्यात तुलना केल्याने ते वादात अडकलेले दिसत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर शाब्दीक हल्ला चढवला असून या प्रकरणी जावेद अख्तर यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर म्हणाले होते की, तालिबान हे दहशतवादी असून त्यांची कृती निंदनीय आहे, पण भारतात आरएसएस, विहिंप आणि बजरंग दलाचे समर्थन करणारे सर्व सारखेच आहेत.
जावेद अख्तर यांनी असेही म्हटले आहे की, भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणावर धर्मनिरपेक्ष आहे, परंतु असे काही लोक आहेत, जे आरएसएस आणि व्हीएचपी सारख्या संघटनांचे समर्थन करतात आणि नाझींसारखीच विचारसरणी बाळगतात. परंतु जावेद अख्तर यांच्या या टिका टिप्पण्या भाजपच्या लोकांना आवडल्या नाहीत आणि त्यांनी अख्तर यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. याबाबत भाजप नेते राम कदम यांनी म्हटले आहे की, जावेद अख्तर यांनी आरएसएस आणि विहिंपची तालिबानशी तुलना केल्याच्या अलिकडच्या वक्तव्याबद्दल माफी मागितल्याशिवाय त्यांचे चित्रपट देशात दाखवले जाणार नाहीत.
तसेच भाजप नेत्यांनी म्हटले की, अशी टीका करून जावेद अख्तर यांनी देशातील गरीब लोकांसाठी काम करणाऱ्या आरएसएस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. आरएसएस तळागाळातील लोकांना मदत करते आणि त्यांनी त्यांची तुलना तालिबानशी केली आहे. हे अयोग्य आहे. त्यामुळे जर त्याने माफी मागितली नाही तर त्याच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल.