कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ‘ त्या ‘वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना अटक होऊन सुटका करण्यात आली. त्यामुळे त्यांचा कोकणातील दौरा तथा जन आशीर्वाद यात्रा अर्धवटच राहिली होती. परंतु कालपासून पुन्हा नारायण राणे हे कोकण दौऱ्यावर आले असून यांच्या जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा आज सुरुवात झाली आहे. रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग येथे राणे समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. या दरम्यान पत्रकार परिषदेत राणे यांनी शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडली नाही.
नारायण राणे यांना अटक झाल्यामुळे त्यांची जनआशीर्वाद यात्रा स्थगित झाली होती. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आता पुन्हा एकदा राणे जनतेचा आशीर्वाद मागायला आले आहे. सध्या राणे तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर आले आहेत. राणे पुन्हा एकदा जनआशीर्वाद घ्यायला बालेकिल्ल्यात आले आहेत. सिंधुदुर्ग, कणकवली शहरात राणे समर्थकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. विशेष म्हणजे ‘ योद्धा पुन्हा मैदानात, ‘अशा आशायचे बॅनर्स शहरभर लागले आहेत. या बॅनर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राणेंचा फोटो आहे. दरम्यान, राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी येणाऱ्या विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा दौरा अचानक रद्द झालेला आहे. आजचा होणारा दौरा रद्द झाल्याचे प्रशासनातर्फे सुचित करण्यात आले आहे. राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेतील नियोजित कोकण दौरा होता. परंतु त्यांनी केलेल्या ‘त्या ‘ वक्तव्याने त्यात खंड पडला होता. दरम्यान दोन दिवस म्हणजेच बुधवारी आणि गुरुवारी आराम करुन कालपासून पुन्हा त्यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु झाली आहे.
विशेष म्हणजे राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या कणकवली शहरात आज जोरदार स्वागत झाले असून राणेप्रेमी कार्यकर्त्यानी कणकवली शहरांत चौकाचौकात राणेंच्या स्वागताला गुढ्या उभारल्या आहेत. शहरभर यात्रेच्या स्वागताचे आधीच फलक लागले आहेत. मुख्य चौकात आकाशकंदील लावले गेले आहेत. कणकवलीतील राणे यांचे स्वागत जंगी झाले असून राणेसमर्थक यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे.तसेच नारायण राणे यांनी आज रत्नागरीतून पुन्हा जन आशीर्वाद यात्रा सुरू केली. यावेळी त्यांनी आंबा, काजू बागायतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काजू- आंबा बागायतदारांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिले.