जळगाव – केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाया सुरूच आहेत. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर रोज धाडी पडत आहे. आपले दोन मंत्री तुरूंगात गेले आहेत. किमान आता तरी गृहमंत्रिपदाचा हिसका दाखवा आणि दोन – चार भाजप नेत्यांना तुरुंगात पाठवा, असे आवाहन खडसे यांनी केले आहे.
विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर शरद पवारदेखील उपस्थित होते. सभेत खडसे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही चांगलेच ताशेरे ओढले. जे एकेकाळी माझे पाय धरायचे. माझा आशीर्वाद घ्यायचे, ते आज माझ्याविरोधात आणि शरद पवारांविरोधात बोलत आहेत, अशा शब्दांत खडसेंनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. कालच देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल १४ ट्वीट करत शरद पवारांवर हिंदुत्वाच्या मुद्यावरून टीका केली होती. याचा संदर्भ देत एकनाथ खडसेंनी फडणवीस यांचा आज समाचार घेतला.
राज्यात रोज १०० धाडी पडत आहेत. तपास यंत्रणांचा एवढा गैरवापर कधी पाहिला नव्हता. कुणी चुकीचे केले असेल तर त्याला शिक्षा मिळालया हवी, याबाबत आपले काही म्हण्णे नाही. मात्र, तपास यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम केले जात आहे, असा आरोप यावेळी खडसे यांनी केला. केवळ आरोप करायचे आणि हे नेतेच मास्टरमाईंड असल्याचे सांगून त्या नेत्याला फसवायचे, कोटी-कोटींचा आकडा जाहीर करायचा, असे प्रकार सध्या राज्यात चालूल असल्याचे खडसे म्हणाले. त्यामुळे आता गृहविभागाने आपला हिसका दाखवत किमान दोन चार भाजप नेत्यांना तुरूंगात पाठवावे, असे आवाहन खडसे यांनी केले. राज्याचा गृहविभाग सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे.