श्याम उगले, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक : नाशिक महापालिकेने २०२२ च्या सुरुवातीला आडगाव शिवारात ३६५ एकरवर आयटीपार्क प्रस्तावित करून नाशिकला आयटी परिषद घेतली होती. त्यानंतर निवडणुका वेळेत न झाल्याने महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाली व हा विषय मागे पडला. दरम्यान जून २०२२ मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्योगमंत्री झालेल्या उदय सामंत यांनी अक्राळे एमआयडीसीत आयटी पार्कसाठी १०० एकर जागा आरक्षित करण्याची घोषणा केली. पुढे २०२३ मध्ये तत्कालीन खासदार हेमंत गोडसे यांच्या हट्टामुळे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राजूर बहुलेच्या एमआयडीसीत ५० एकर जागेवर आयटीपार्क उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर २०२४ मध्ये पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर भाजप आमदार सीमा हिरे यांनी आयटी पार्कचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडला. आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राजूर बहुलेत आयटी पार्कसाठी २५ एकर जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महापालिका हद्दीत १५ एकर जागा आयटीपार्कला दिली जाणार आहे. म्हणजे गेल्या साडेतीन वर्षांमध्ये नाशिकला आयटी पार्क प्रत्यक्षात आले नाहीच, पण घोषणांमध्ये या आयटीपार्कचे क्षेत्र घटता घटता घटे, असे कमी कमी होत चालले आहे.
नाशिक येथे आयटी पार्क नसल्याने स्थानिक तरुणांना पुणे,बंगलोर आदी मोठ्या शहरांमध्ये जावं लागते. यामुळे नाशिक शहर परिसरात आयटी पार्क उभारण्याची अनेक वर्षांची मागणी आहे. त्यासाठी नाशिक महापालिकेच्या पुढाकारातून २००३ मध्ये अडीच कोटी रुपये खर्च करून आयटी पार्कची दोन मजली इमारत उभारण्यात आली. प्रत्यक्षात तेथे एकही आयटी कंपनी आली नाही. त्यामुळे अखेर जागा वापराचा उद्देश बदलून ते गाळे इतर कंपन्यांना भाडेतत्वावर देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर २०२२ मध्ये नाशिक महापालिकेने आडगाव शिवारात ३६५ एकर जागेवर आयटी पार्क उभारण्याचा प्रस्ताव मांडून त्यासाठी नाशिकमध्ये आयटी परिषद घेतली. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार व महापालिकेत भाजपची सत्ता असे गणित होते. यामुळे तत्कालीन केंद्रीय लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना त्या परिषदेला बोलावण्यात आले. दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने नाशिक महापालिकेवर प्रशासकीय राजवट आली व आयटी पार्कचा विषय मागे पडला.
राज्यात जून २०२२ मध्ये सत्तांतर होऊन महायुतीचे सरकार आले व उदय सामंत उद्योगमंत्री झाले. या उद्योग मंत्र्यांनी त्यांच्या प्रत्येकवेळच्या नाशिक दौऱ्यात आयटी पार्कच्या ठिकाणात व आयटी पार्कसाठी दिल्या जाणाऱ्या क्षेत्रात बदल करण्याच्या घोषणेशिवाय काहीही केले नाही. डिसेंबर २०२२ मध्ये दौऱ्यावर आलेले मंत्री सामंत यांनी नाशिकला १०० एकरवर आयटी पार्क उभारला जाणार असून तेथे डेटा सेंटर कंपनी येणार असल्याचे सांगितले.यावेळी त्यांनी नाशिक महापालिका हद्दीतील जागेऐवजी आयटी पार्क दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथे उभारण्याची घोषणा केली.
पुढे तत्कालीन खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठ पुराव्यामुळे उद्योगमंत्र्यांनी पुढच्यावेळी म्हणजे ऑक्टोबर २०२३ मध्ये आयटी पार्कचे ठिकाण अक्राळेवरून नाशिक तालुक्यातील राजूर बहुले येथे हलवले व त्याचे क्षेत्र १०० एकरवरून ५० एकर केले व उद्योग विभागाने तशी अधिसूची प्रसिद्धही केली. दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. नाशिकच्या भाजप आमदारांनी दोन कार्यकाळात नाशिकसाठी काय दिले, हा मुद्दा विरोधकांनी समोर आणला. याला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिकच्या सभेत नाशिकला आयटी पार्क उभारण्याची घोषणा झाली. निवडणुकीत नाशिकसह राज्यातील मतदार महायुतीच्य मागे उभे राहिले यामुळे महायुतीची सत्ता आणखी भक्कमपणे कायम राहिली. यामुळे नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी हिवाळी अधिवेशनात नाशिकला आयटी पार्क उभारण्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयटी पार्क उभारण्याची घोषणा विधानसभेत केली.
त्यानंतर जवळपास सात महिन्यांनी नाशिकमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली व त्यात राजूरबहुले येथे आयटीपार्कला २५ एकर जागा देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच नाशिक महापालिका हद्दीत आयटी पार्कसाठी १५ एकर जागेलाही मान्यता देण्यात आली. मुळात डिसेंबर २०२३ च्या उद्योग मंत्रालयाच्या अधिसूचित राजूर बहुले येथे आयटी पार्कसाठी ५० एकर जागा मंजूर केली होती, तिचे काय झाले, असा प्रश्न कोणालाही पडला नाही. या बैठकीस नाशिकच्या तीन आमदारांपैकी केवळ सीमा हिरे उपस्थित होत्या. आता या मंजुरी दिलेल्या आयटीपार्कच्या जागेवर खरोखर आयटी उद्योग येणार की अंबड आयटीपार्क प्रमाणे आणखी दहा पंधरा वर्षांनी जागेच्या वापराचा उद्देश बदलण्याची अधिसूचना निघणार याची नाशिककराना प्रतीक्षा आहे.
shaymugale74@gmail.com