इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अमेरिकेच्या इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जगभरातील तेलाच्या किमती वाढणार आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव इराणच्या संसदेत मंजूर झाला आहे. आता याबाबतचा अंतिम निर्णय इराणी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी घेणार आहेत. हा मार्ग बंद झाल्यास भारत, चीन आणि पाकिस्तानला फटका बसू शकतो.
जगातील २० टक्के तेलाचा व्यापार होर्मुझच्या सामुद्रधुनीतून चालतो. या मार्गाने बहुतेक तेल आशियाई देशांमध्ये जाते. तसेच या मार्गाने तेलासह वायूचीही वाहतूक केली जाते. आशियाई देशांसाठी हा महत्वाचा निर्यात मार्ग आहे. त्यानुळे भारतातही तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. हा समुद्रमार्ग बंद झाल्यास भारतातून आखाती देशांमध्ये निर्यात होणारा माल लांबच्या मार्गाने निर्यात करावा लागणार आहे. त्यामुळे निर्यातीचा खर्च वाढणार आहे.
भारत मध्य पूर्वेतील देशांमधून तेलाची आयात करतो. भारताला लागणारे ५० टक्के तेल आणि नैसर्गिक वायू होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येतात. भारत ४०टक्के एलएनजी कतारमधून आणि १० टक्के इतर आखाती देशांमधून आयात करतो. तसेच भारत २१ टक्के तेलाची आयात इराक आणि उर्वरित इतर आखाती देशांमधून करतो. त्यामुळे इराणने हा मार्ग बंद केला तर भारतातील तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात.