मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आयपीएलमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा पंजाब किंग्जने ५४ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या पराभवामुळे आरसीबीचे नुकसान झाले आहेच, शिवाय प्ले ऑफचे समीकरणही किचकट झाले आहे. आयपीएलचा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. दहा संघांपैकी मुंबई आणि चेन्नईचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. तर गुजरात टायटन्स प्ले ऑफसाठी पात्र ठरला आहे. आता स्पर्धेतील दहा सामने बाकी आहेत आणि उर्वरित सात संघांमध्ये प्ले ऑफची चुरस पाहायला मिळणार आहे.
पंजाबविरुद्ध मोठ्या फरकाने पराभव झाल्यामुळे आरसीबीच्या अडचणी वाढल्या आहेत. १३ सामन्यांत आरसीबीचा हा ६ वा पराभव आहे. त्यांचा पुढील सामना बलाढ्य गुजरात टायटन्ससोबत होणार आहे. आरसीबीला या सामन्यात गुजरातला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल. कारण फक्त विजय मिळवून १६ गुण मिळाले, तरी नेट रनरेट कमी असणे हा मुद्दा त्यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. पंजाबकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आरसीबीचा नेट रनरेट -०.३२३ वर आला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा पराभव झाल्यामुळे ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स, मयंक अग्रवालच्या पंजाब किंग्ज आणि केन विलियम्सनच्या सनरायजर्स हैदराबाद या संघाचा फायदा झाला आहे. दिल्ली आणि पंजाबला उर्वरित दोन सामने जिंकावे लागतील. तर हैदराबादला १६ गुण मिळविण्यासाठी सलग तीन विजय मिळवावे लागतील. त्यानंतर नेट रनरेटनुसार संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरणार आहेत. दिल्ली आणि पंजाबने सध्या १४-१४ गुण मिळविले आहेत. तर हैदराबादने ११ सामन्यात १० गुण मिळविले आहेत. या परिस्थितीत पंजाबचा मार्ग कठीण होणार आहे. पंजाबला पुढील दोन सामने दिल्ली आणि हैदराबाद विरुद्ध खेळायचे आहेत. या दोन सामन्यांनंतर प्ले ऑफचे चित्र स्पष्ट होणार आहे.
दोन वेळा स्पर्धेचे विजेतेपद मिळविणारा केकेआरचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची आशा खूपच कमी आहे. श्रेयस अय्यर नेतृत्वाखाली खेळणाऱ्या केकेआरने १२ पैकी ५ सामने जिंकून गुणतालिकेत ८ व्या स्थानावर आहे. केकेआरने उर्वरित दोन सामने जिकंले तरी त्यांना १४ गुणच मिळणार आहेत. त्यामुळे इतर संघाच्या कामगिरीवर त्यांचे प्ले ऑफचे तिकीट अवलंबून आहे. केकेआरचा नेट रनरेट -०.०५७
के एल राहुल याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनऊ सुपर जाएंट्सला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी दोनपैकी एक सामना जिंकावा लागणार आहे. १६ गुण मिळवून लखनऊचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांचे पुढील दोन सामने राजस्थान रॉयल्स आणि केकेआरविरुद्ध खेळले जाणार आहेत. संजू सॅमसनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या राजस्थानने उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर तो संघ सहजच प्ले ऑफसाठी पात्र ठरणार आहे. परंतु एक पराभव झाला तर त्यांचे १६ गुण होतील आणि त्यांना पुन्हा नेट रनरेटवर अवलंबून राहावे लागणार आहे. सध्या राजस्थानचा नेट रनरेट + ०.२२८ आहे. इतर संघांच्या तुलनेत हा नेट रनरेट खूपच चांगला आहे.