पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्येष्ठ उद्योगपती आणि पद्मभूषण राहुल बजाज (वय ८३) यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांना येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. हृदय आणि फुफ्फसाचा त्यांना आजार झाला होता. उपचारादरम्यान आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. बजाज चेतक या स्कूटरची निर्मिती करुन त्यांनी भारतीयांना अनोखी स्कूटर उपलब्ध करुन दिली. हमारा बजाज या जाहिरातीमुळे बजाज सर्व भारतीयांना ख्यात होते.
राहुल बजाज यांचा जन्म कोलकाता येथे १० जून १९३८ रोजी झाला. मारवाडी कुटुंबात जन्मलेल्या बजाज यांनी उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. बजाज ग्रुप उद्योग समुहाचे ते चेअरमन होते. तसेच, ते काही काळ राज्यसभा खासदारही होते. त्यांनी अर्थशास्त्र आणि लॉमध्ये पदवी संपादन केली होती. तसेच, त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनतर त्यांनी बजाज उद्योग समुहात कार्य सुरू केले. त्यांना राजीव आणि संजीव ही दोन मुले तर सुनयना ही मुलगी आहे. २००१ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राहुल बजाज यांनी त्यांच्या उद्योग समुहाची सूत्रे राजीव आणि संजीव या पुत्रांकडे काही वर्षांपूर्वीच दिली आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योजक जमनालाल बजाज हे राहुल बजाज यांचे आजोबा होत. बजाज उद्योग समुहाने लाखो जणांना रोजगार उपलब्ध करुन दिला. त्यांच्या नेतृत्वात उद्योग भरभराटीला आला. त्यांच्या जाण्याने औद्योगिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. सर्व क्षेत्रातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे.
https://twitter.com/udaykotak/status/1492458779157626886?s=20&t=YqrAomtnkIKMektEmvm1eA
राहुल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योगाच्या विकासात केवळ भरीव योगदान देणारा ज्येष्ठ उद्योजकच आपण गमावला नाही तर सामाजिक भान असलेला, आणि देशासमोरील समस्यांवर निर्भिडपणे आपली मते मांडणारा, तरुण उद्योजकांचा प्रेरक असा देशाभिमानी उद्योजक आपल्यातून गेला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत. राहुल बजाज यांनी दुचाकी वाहनांच्या उत्पादनात देशात क्रांती आणली तसेच जगातील या क्षेत्रातील इतर कंपन्यांसमोर भारताचे आव्हान उभे केले. त्यांनी केवळ आपल्या उद्योगाचा विकास असा संकुचित विचार केला नाही तर देशातील सर्वच उद्योगांच्या समस्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी यावर स्पष्ट व निग्रही भूमिका घेतली. एक सच्चा देशभक्त उद्योजक म्हणून देशासमोरील काही समस्यांवर देखील त्यांनी भाष्य केले आणि जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सामाजिक कार्यही उद्योजकांनी सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी त्याचे उत्तम उदाहरण होते. राहुल बजाज हे विशेषत: उद्योजकांच्या युवा पिढीचे मार्गदर्शक होते. त्यांनी राज्य शासनाला देखील उद्योगाच्या विकासासंदर्भात वेळोवेळी महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत. त्यांच्या जाण्याने निश्चितच राज्याच्या उद्योग विश्वाचे नुकसान झाले आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या श्रद्धांजलीपर संदेशात म्हणतात.
गेल्या पाच दशकांमध्ये बजाज समूहाला नावारुपाला आणण्यात राहुल बजाज यांनी प्रचंड योगदान दिले. त्यांचा प्रदीर्घ अनुभव, ज्ञान, दूरदृष्टीचा बजाज उद्योगासह भारतीय ऑटो उद्योगाच्या विकासात मोलाचा वाटा राहिला आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात बजाज कंपनीमुळे भारताला स्वतंत्र ओळख मिळाली. स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जमनालाल बजाज यांचा देश सेवेचा वारसा त्यांनी आयुष्यभर जपला. उद्योग क्षेत्रात कार्यरत असूनही राहुल बजाज यांनी आयुष्यभर सामाजिक भान जपले. त्यांच्या दातृत्वाच्या गुणामुळे अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचे निकटचे संबंध राहिले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली असून भारताने एक महान सुपुत्र गमावला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगपती राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे