नवी दिल्ली – नाशिक भगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष तथा भगर उद्योजक महेंद्र छोरिया यांची केंद्रीय कृषी मंत्रालयाने निवड केली आहे. २०२३ हे वर्ष मिलेट (तृणधान्य) म्हणून साजरे करण्याचे ठरविले आहे. तृणधान्य मानवी शरिराला अत्यंत पोषक असून त्याची जनजागृती करण्यासाठी हे वर्ष निश्चित केले आहे. यासाठी कृषी मंत्रालयाने तज्ज्ञांची कृती समिती गठीत केली आहे. या समितीत छोरिया यांची निवड करण्यात आली आहे. छोरिया यांच्या नाशिकमध्ये ३ भगर मिल आहेत. तसेच, ते भगर मिल असोसिएशनच्या माध्यमातून अतिशय सक्रीय असतात. त्यांना नुकताच पोषक अनाज पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे. हायटेक्स इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (HICC) हैदराबाद येथे न्युट्रिहब, आयआयएमआर यांच्यातर्फे “न्यूट्री-सेरियल्स मल्टी-स्टेकहोल्डर्स मेगा कन्व्हेन्शन” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भगर उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये अत्याधुनिकरण केल्याबद्दल छोरिया यांना मानांकन मिळाले. या पुरस्काराने गौरविण्यात आलेले ते महाराष्ट्रातील एकमेव आणि सर्वप्रथम उद्योजक झाले आहेत. तृणधान्याच्या इको-सिस्टीममध्ये काम करणाऱ्या भागधारकांना व्यासपीठावर एकत्र आणणे, तसेच उत्पादक आणि ग्राहकांमध्ये तृण धान्याबद्दल जागरूकता निर्माण करणे, असा २०२३ या वर्षाचा उद्देश आहे.