नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील पहिले कायमस्वरुपी ग्राहक प्रबोधन केंद्र नाशिकमध्ये साकारण्यात आले आहे. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा या केंद्राचे उदघाटन येत्या सोमवारी (दि. ३० मे) होणार आहे.
वैधमापनशास्त्र विभाग, नाशिक महानगरपालिका आणि नाशिक फर्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तिडके कॉलनी येथील नाशिक फर्स्ट च्या ट्रॅफिक एज्युकेशन पार्क मध्ये हे केंद्र साकारण्यात आले आहे. कायमस्वरुपी ग्राहक प्रबोधन केंद्राच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन सोमवारी दुपारी ४ वाजता पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आणि मनपा आयुक्त रमेश पवार, वैधमापनशास्त्र विभागाचे नियंत्रक डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.
आज जगामध्ये सर्वात मोठी व उत्स्फुर्त चळवळ म्हणजे ग्राहक सरंक्षण चळवळ होय. १८ व्या शतकाच्या सुरुवातीला जगामध्ये या चळवळीला सुरुवात झाली. अमेरिका हे पहिले राष्ट्र होय की जेथे या कार्याला कायद्याचा आधार मिळाला. आज जगामध्ये सर्व ठिकाणी दुरवर सदर चळवळ पोहचली आहे. शासन स्तरावर सध्या राष्ट्रीय ग्राहक दिन व जागतीक ग्राहक दिन असे दोन दिवस अनक्रुमे दिनांक २४ डिसेंबर व १५ मार्च या दिवशी साजरी केले जातात. सदर दिवसांचे औचित्य म्हणून प्रदर्शने, चर्चा सत्रे व स्पर्धा आयोजित केल्या जातात. ग्राहकांचे हक्क व माहिती सांगितली जाते. परंतु या सर्व बाबींचे आयोजन तात्पुरत्या स्वरुपात एका सप्ताहासाठीच केले जाते. त्यामुळे त्याचे महत्व मर्यादीत कालावधीसाठीच टिकते. सदर विषयाचे महत्व व व्याप्ती लक्षात घेता कायमस्वरुपी ग्राहक प्रबोधन केंद्र सुरु करण्याची नितांत आवश्यकता होती, याच कारणाने वैधमापनशास्त्र यत्रंणा, महाराष्ट्र राज्य, मुंबई, नाशिक फर्स्ट व महानगरपालिका नाशिक हे एकत्र येऊन संयुक्तरित्या हे केंद्र सुरु करीत आहेत.
या केंद्रास विद्यार्थी व नागरिकांनी एकदा तरी भेट द्यावी असे आवाहन नाशिक फर्स्टचे चेअरमन अभय कुलकर्णी व वैधमापनशास्त्र विभाग नाशिक जिल्हा सहआयुक्त, नरेंद्र सिन्हा व सहाय्यक आयुक्त जयंत राजदेरकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
ग्राहक प्रबोधन केद्रांची वैशिष्ठ्ये
१) ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करुन देणे.
२) कायद्याविषयी माहिती ग्राहकापर्यंत पोहचविणे.
३) ऑडीओ व व्हिडीओच्या द्वारे, मनोरंजनाच्या माध्यमातनू सर्व माहिती प्रस्तूत करणे.
४) सदर केंद्र हे देशातील पहिले कायमस्वरूपी ग्राहक प्रबोधन केंद्र असुन असे पहिले केंद्र उभारण्याचा मान महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे.
आजपर्यंतच्या पाहणीमध्ये लक्षात आलेले मुद्दे
१) ग्राहकांचे शोषण नेहमी त्यांच्या अज्ञानामुळेच होत असते.
२) ग्राहक हक्क व कायदयाची माहिती ग्राहकापर्यंत पोहचविल्यास सदर शोषण लाक्षणिकरित्या कमी होऊ शकते.
३) सध्या शासन व ग्राहक यांचे सेतू तयार करणारी यत्रंणा अस्तीत्वात नसून सदर त्रृटी या केंद्रामुळे दुर होईल.