नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -शासकीय यंत्रणेकडून राबवण्यात आलेल्या उत्कृष्ठ उपक्रमांची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावर नामांकन देत यामधून सर्वोत्कृष्ठ उपक्रमांना स्कॉच ग्रुप या संस्थेच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतुन नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने राबवण्यात येतोय या उपक्रमांतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा प्रभावी उपयोग करून पाणी टंचाई असणाऱ्या गावांमध्ये जमिनीतील पाणी पातळी वाढावी यासाठी बंधारे निर्मिती करण्यात येत आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी स्कॉच रेटिंग ग्रुप या संस्थेच्या वतीने नाशिक जिल्हा परिषदेला राष्ट्रीय स्कॉच पुरस्कार जाहीर झाला, दि.१३ रोजी दिल्ली येथे स्कॉच ग्रुपचे चेअरमन समीर कोचर यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी स्वीकारला.
फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय स्कॉच पुरस्काराचे ऑर्डर ऑफ मेरीट प्रमाणपत्र दुरदृश्यप्रणालीद्वारे स्कॉच ग्रुपचे रोहन कोचर यांच्या हस्ते जिल्हा परिषद नाशिकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी स्वीकारले होते यानंतर मिशन भगिरथ प्रयास या विशेष उपक्रमासाठी देण्यात आला. देशभरातून 300 विविध प्रकल्पांनी या स्पर्धेत भाग घेतला होता ज्यामधील 75 प्रकल्प ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्कारासाठी पात्र झाले होते. विविध विषयातील तज्ञांनी दिलेले गुण तसेच नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने केलेले वोटिंग यातून नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने राबवण्यात आलेला मिशन भागीरथ प्रयास उपक्रम हा अव्वल ठरला आहे.
मिशन भगीरथ प्रयास अंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात २६१ साखळी बंधारे आजतागायत पूर्ण झाले आहे. सदर उपक्रमाच्या माध्यमातून जलसंधारणाच्या बाबतीत गावे स्वयंपूर्ण होण्यास मदत झाली आहे. पूर्णतः वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवत साखळी बंधाऱ्यांसोबतच वृक्षारोपण, जल पुनर्भरण, शोषखड्डे, सीसीटी इत्यादी विविध पूरक उपक्रम केल्यामुळे जलस्त्रोत बळकटीकरणास मदत झाली आहे. नाशिक जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांसाठी राबवण्यात आलेल्या मिशन भागीरथ प्रयास उपक्रमाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने देखील ही अभिमानाची बाब आहे.