इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीत रामराम करत फिरत आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी कोकणात केली. मला त्यांना सांगायचं आहे की, औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केली आहे.
त्यांनी सोशल मीडियावर टाकेलल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगले पण तुम्ही आता राष्ट्रविरोधी विचारांना साथ देत आहात. सत्ता गेल्यानंतर तुम्हाला कोकणवासीयांची आठवण झाली. अडीच वर्षे सत्तेच्या काळात कोकणला दमडीही दिली नाही. उलट चांगल्या प्रकल्पांना विरोध केला आणि ही देवभूमी विकासापासून वंचित ठेवली. आता फक्त मतं मिळविण्यासाठी तुम्हाला कोकणची आठवण झाली.
कोकण वादळात सापडलं तेव्हा तुम्ही घरात बसून होतात तर देवेंद्र फडणवीस व नारायण राणे कोकणात येऊन लोकांना आधार देत होते. महापूर आला तेव्हा तुमच्या लोकांनी केलेली गुंडगिरी कोकणी माणूस विसरला नाही. मोदीजी आणि नारायण राणेजींच्या प्रयत्नातून कोकणचा विकास होतोय. आता तुम्ही कितीही थापा मारल्या तरी कोकणी माणूस तुमच्या खोट्या भूलथापांना बळी पडणार नाही.









