बुधवार, ऑगस्ट 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आज आहे वंदे मातरम चा जन्म दिन… त्याविषयी तुम्हाला हे माहीत आहे का…

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 21, 2023 | 12:03 pm
in राष्ट्रीय
0
IMG 20231121 WA0007

मिलिंद सबनीस, पुणे
आज कार्तिक शुद्ध नवमी आजच्याच तीथीला १४८ वर्षांपूर्वी ७ नोव्हेंबर १८७५ या दिवशी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ‘वन्दे मातरम् ‘ हे गीत कलकत्त्याजवळील नैहाटी कांटालपाडा या आपल्या जन्मगावी लिहिले . भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे स्थान मिळवलेल्या या गीताचे १४९ वे जन्मवर्ष सुरू होत आहे .

भारताच्या इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्याला ‘वन्दे मातरम्’ या दोन शब्दांचे अस्त्र मिळाले. आणि या दोन शब्दांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा संपूर्ण इतिहासच बदलला, एवढेच नव्हे तर इतिहास घडवलासुद्धा ! ‘माते तुला वंदन असो.’ असा साधा-सरळ अर्थ असलेले हे शब्द. इंग्रजांना त्याचे एवढे भय का वाटावे? हिमालयाची उत्तुंगता, गंगेची निर्मलता अशा उपमा ज्या गीताला लागू पडतील असे हे गीत! एरवी अत्यंत सरल शब्द असलेल्या आणि तरल भावना असलेल्या या गीतांच्या श्रीकृष्णाच्या वेणूनादासारख्या शब्दांनी इंद्राच्या वज्राचे, हनुमानाच्या गदेचे, अर्जुनाच्या धनुष्याचे, श्रीविष्णूंच्या सुदर्शनचक्राचे, अष्टभुजा दुर्गेच्या हातातील शत्रुसंहारक अस्त्रांचे रूप धारण केले.

IMG 20231121 WA0006

राष्ट्राच्या जडणघडणीत अनेक व्यक्तिंच्या संघटनाच्या कर्तृत्वाचे, कामगिरीचे मोठे योगदान असते. परंतु एका गीताने किंबहुना त्यातील केवळ दोन शब्दांनी राष्ट्राच्या इतिहासाला वळण देण्याचे उदाहरण अपवादात्मकच आहे. १८७५ मध्ये बंकिमचंद्रांच्या अलौकिक प्रतिभेतून हे गीत निर्माण झाले. तेव्हापासून आजपर्यंत ‘वन्दे मातरम्’ या विषयासंदर्भात अनेक छोट्या-मोठ्या घडामोडी झाल्या, आजही होत आहेत. एखाद्या व्यक्तिच्या जीवनामध्ये जसे सुख-दुःखाचे चढ-उतार यावेत, अनेक स्थित्यंतरे घडतात. अशी स्थित्यंतरे ‘वन्दे मातरम्’ या गीता संदर्भातही झाली. इतिहासातील द्रष्ट्या व्यक्तिंचे विचार कधीही कालबाह्य होत नाहीत. पुढील काळाचा या व्यक्तिंनी केलेला नेमका विचार हेच त्या मागचे खरे कारण आहे. कालानुरूप त्यांनी मांडलेल्या विचारांचे स्वरूप बदललेले असू शकते. हाच विचार व्यक्तिप्रमाणे एखाद्या कलाकृतीबाबत करावयाचा झाला, तर अशा द्रष्ट्या कलाकृतींत ‘वन्दे मातरम्’चे नाव अग्रक्रमाने राहील.

बंकिमचंद्रांनी आपल्या प्राचीन परंपरेचे भान ठेवत केलेले राष्ट्रचिंतन, या चिंतनातून समृद्ध देशाचे पाहिलेले स्वप्न आणि या मातृभूमीच्या सर्व पुत्रांमध्ये एकत्वाची भावना ठेवून समर्पणाचा केलेला निर्धार, ही या गीताची वैशिष्ट्ये म्हणता येतील. ही सारी वैशिष्ट्ये फार कमी लेखनकृतींमध्ये दिसतात. ज्या लेखनकृतींमध्ये ही वैशिष्ट्ये दिसतात, त्याच साहित्यकृतींत चिरंतन राहतात. ‘वन्दे मातरम्’ ही अशीच चिरंतन टिकणारी साहित्यकृती आहे.
या गीताच्या निर्मितीपासूनचा इतिहास बघितला, तर स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात याचे अत्यंत मोठे योगदान आहे. स्वातंत्र्यापूर्वीच्या बहुतेक सर्व टप्प्यांवर या गीताची नोंद घ्यावीच लागते. ‘वन्दे मातरम्’ ही साहित्यकृती अशा दुर्मीळ भाग्यवान साहित्यकृतींपैकी एक आहे. या कवितेवर जसे भारतीय जनतेने आत्यंतिक प्रेम केले, तसाच त्याला विरोधही झाला. एखादे गीत संपूर्ण राष्ट्राच्या स्वातंत्र्याचे प्रेरणास्थान व्हावे इतकेच नव्हे, तर त्याच्या नुसत्या दोन शब्दांनी या भारतमातेसाठी, या राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करण्याचे सामर्थ्य प्रतीत व्हावे, हेच विलक्षण आहे. आजच्या आधुनिक काळात रवीन्द्रनाथ, श्रीअरविंद यांसारख्या प्रतिभावंतांना त्यामध्ये मंत्रसामर्थ्याची लक्षणे दिसावीत, हे या गीताचे भाग्य आहे. या गीताच्या बळावर अनेक सर्वसामान्यांनी स्वातंत्र्यलढ्यात स्वत:ला झोकून दिले. काहींनी हौतात्म्य पत्करले. म्हणूनच हे गीत केवळ एक साहित्यकृती न राहता त्याहीपेक्षा एका सर्वोच्च स्थानावर विराजमान झाले आहे.

आपली संस्कृती मातृप्रधान आहे. देशाला मातृभूमी असे संबोधणे असा आदर्श अथर्वन ऋषींनी अथर्ववेदातील पृथिवीसूक्तात घा-लून दिला होता. विस्मृतीत गेलेली ही कल्पना १८५० च्या सुमारास बंगाली प्रतिभावान कवी व संपादक असलेल्या ईश्वरचन्द्र गुप्त यांनी ‘जननी भारतभूमी आर केन थाक तुमी ।’ या कवितेतून पुर्नरुज्जिवित केली. त्यांचाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून, त्यांचेच शिष्य बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या अलौकिक प्रतिभेतून ‘वन्दे मातरम्’च्या रूपाने अतीव सुंदर असा आविष्कार झाला. प्राचीन काळी वेदांची निर्मिती करणाऱ्या ऋषीमुनींची नावे इतिहासाला अज्ञात आहेत. पण हजारो वर्षांच्या कालौघात हे वेद निरंतर टिकले आहेत. याचे महत्त्वाचे कारण ते शब्द ऋषीमुनींच्या साधनेतून, चिंतनातून, तपस्येतून जन्माला आले आहे. बंकिमचंद्रांना बंगालमध्ये ‘ऋषी बंकिम’ असेच संबोधिले जाते. स्वतः बंकिमचंद्र ऋषीतुल्य असल्यामुळे त्यांना स्फुरलेल्या ‘वन्दे मातरम्’ या शब्दांना वेदमंत्राचे स्थान मिळाले आहे. आधुनिक काळात बंकिमचंद्रांनीच भारतीय राष्ट्रवाद रुजवला. आपल्या लेखणीचा प्रभावी वापर करून लोकांच्या मनात राष्ट्रीय वृत्ती जागृत करणारे आधुनिक काळातील पहिले लेखक म्हणून बंकिमचंद्रांचा उल्लेख करावा लागेल.

बंकिमचंद्रांनी स्वातंत्र्याशी संबंधित कोणत्याही चळवळीत सहभाग घेतला नसला, संघटना उभी केली नसली तरीही त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला ‘वन्दे मातरम्’ सारखे शस्त्र दिले. क्रांतिकारकांच्या मनाची मशागत करणारा ‘आनंदमठ’ सारखा ग्रंथ दिला. म्हणून श्रीअरविंदांनी त्यांना आधुनिक भारतीय राष्ट्रवादाचे निर्माते म्हटले आहे.

बंकिमचंद्रांबद्दल श्रीअरविंद असे लिहितात, “भारतनिर्मात्यांचा यथार्थ गौरव करण्यासाठी पुढील पिढी जेव्हा स्तुतिस्त्रोत्रे गाईल, पुष्पहार घेऊन पुढे येईल. तेव्हा ती आपल्या हातातील पुष्पमाला सत्तासक्त राजकारण्यांच्या घामट कपाळावर ठेवणार नाही, की भाषणबाज सुधारकांच्या डोक्यावर घालणार नाही. तर सत्तेची किंवा मत्तेची इच्छाही मनात न धरता निसर्गाप्रमाणे सहज कर्तव्य म्हणून शांतपणे काम करीत राहणाऱ्या कसल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आपल्यामधले अत्युत्कृष्ट म्हणून जे असेल ते देत राहणाऱ्या या दयाळू बंगपुरुषांच्या प्रसन्न कंठात अर्पण करील.”
कारण इथं बंकिमचंद्र ‘वन्दे मातरम्’ असे लिहितात. ते ‘वन्दे भारतम्’ लिहीत नाहीत. कारण आमच्या संस्कृतीचे राष्ट्रवादाचे सूत्र मातृपूजनात आहे. विश्वात्मक संस्कृतीचा तो काव्यमय आविष्कार आहे. म्हणूनच हे शब्द प्रत्येक भारतीयांच्या मनात पक्के ठसलेले आहेत. त्याची सक्ती करण्याचीही आवश्यकता नाही. आवश्यकता आहे ती ‘वन्दे मातरम्’ला धार्मिक वळण देणारे मूठभर धार्मिक नेते आणि त्याचा राजकीय उपयोग करून घेणाऱ्या राजकारण्यांनी सुरू केलेली ‘वन्दे मातरम्’ विरुद्धची मोहीम मोडून काढण्याची. हे गीत केवळ हिंदुत्ववादी संघटनांचे गीत आहे, हीच स्वातंत्र्योत्तर काळातील समजूत नाहीशी व्हायला हवी. या शब्दांना क्रांतिकारकांच्या आणि स्वातंत्र्यलढ्यातील आंदोलकांच्या बलिदानाचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे. आजही या गीताबद्दल संसदेमध्ये वाद होतात, न्यायालयात अर्ज करून ‘वन्दे मातरम्’ गायनावर आक्षेप घेतला जातो, यासारखे दुसरे दुर्दैव कोणते ? राजकीय लाभासाठी ‘वन्दे मातरम्’ चा दुरूपयोग नकोच.
१९४७ साली स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी ‘ वन्दे मातरम् ‘ हेच राष्ट्रगीत होणार अशी सर्वांनाच खात्री होती पण तत्कालीन राजकीय नेतृत्वाने कविवर्य रवींद्रनाथांच्या जन गण मन ला कौल दिला . परंतु ‘ वन्दे मातरम् ‘ च्या मागे असलेलं जनमत लक्षात घेऊन २४ जानेवारी १९५० रोजी झालेल्या घटना समितीच्या शेवटच्या सभेत जन गण मन ला राष्ट्रगीत म्हणून जाहीर करतांना ‘वन्दे मातरम् ‘ला राष्ट्रीय गीत म्हणून स्थान देतांना या गीताला राष्ट्रगीता बरोबरचा समान दर्जा देण्यात आला .

आसेतु हिमालय पसरलेल्या खंडप्राय मातृभूमिप्रती असलेली भक्तिभावना हाच ‘वन्दे मातरम्’ या शब्दामधला गाभा आहे. आज नेमकी हीच भावना कमी झाली आहे. मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पिण्याची भावना केवळ प्राणपणाने लढणाऱ्या आमच्या भारतीय सैनिकांमध्ये फक्त असावी का? ती भावना ‘वन्दे मातरम्’च्या रूपाने मनात का रुजू नये? ‘वन्दे मातरम्’ हे त्या भावनेचे शब्दरूप स्वरूप आहे. आज आपली मातृभूमी, हा हिंदुस्थान एक समर्थ चैतन्यमय राष्ट्र म्हणून साऱ्या जगतात उभा राहायला हवा असेल, तर या मंत्राची पुनःस्थापना व्हायलाच हवी . मातृभूमीवरचं हे प्रेम नैसर्गिकच असते. आपल्या स्वतःच्या जन्मदात्री आईवर जेवढे प्रेम प्रत्येकाचे असतं तितकेच हे प्रेम प्रत्येकाच्या हृदयात आहेच. फक्त त्यावर चढलेली नैराश्याची आवरणे बाजूला करावी लागतील. ‘वन्दे मातरम्’च्या मन:पूर्वक उच्चारणातून हे नक्की घडू शकेल. स्वातंत्र्यपूर्व काळात अभूतपूर्व अशी कामगिरी केलेल्या ‘वन्दे मातरम्’ला राष्ट्र गीताचा समान दर्जा ( राष्ट्रीय गीत National song ) मिळाला . या गीतामध्ये ‘वसुधैव कुटुंबकम’ सारखी विश्वात्मक भावना आहे. त्यातील शब्दरचना, भाव सर्वच ओजस्वी आहे. आपल्या भारतीय संस्कृतीतील अध्यात्म त्यात एकवटले आहे. संपूर्ण गीतगायनातून निर्माण होणारा नाद आणि वातावरण हे शब्दातीत आहे. आपल्या जन्मभूमीचे यथार्थ दृश्यात्मक दर्शन व्हावे, असे सामर्थ्य या शब्दांमध्ये आहे.

आज आपण हा मंत्र विसरलो आहोत म्हणून ‘भारत माझा देश आहे’ यासारखी प्रतिज्ञा मुद्दाम घेण्याची आवश्यकता वाटते. भारतभूमी माझी मातृभूमी आहे. तिच्यासाठी मी स्वतः सर्वस्व अर्पिनच; परंतु अशी तयारी असणारे हजारो तरुण मी तयार करीन, अशी भावना ‘वन्दे मातरम्’च्या उच्चारणामधूनच प्रत्येकाच्या मनात निर्माण होईल. त्यासाठी आजच्या राजकारणाकडे न पाहता इतिहासाचे अवलोकन करण्याची आवश्यकता आहे. ‘वन्दे मातरम्’ म्हणत सर्वस्व अर्पिणाऱ्या देशभक्तांच्या चरित्रातून अशी प्रेरणा सहज मिळते. आजच्या काळात तशा क्रांतीची किंवा समर्पणाची गरज असेलच असे नाही. तरीही काळाचे संदर्भ बदललेले असतानासुद्धा या शब्दांचेच महत्त्व कमी झालेले नाही. होणारही नाही.
‘वन्दे मातरम् ‘
मिलिंद प्रभाकर सबनीस पुणे भ्रमणध्वनी: ९४२२८८१७८३
Email : sabnisvandemataram@gmail.com

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून आतापर्यंत इतके कोटी झाले जप्त…सात पटीने झाली वाढ

Next Post

ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात या पोलिसांना गमवावी लागली नोकरी….

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना जुने मित्र भेटेल, जाणून घ्या, बुधवार, २७ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 26, 2025
IMG 20250826 WA0402
स्थानिक बातम्या

नाशिक जिल्हा परिषद विकास निर्देशांकात राज्यात प्रथम…मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते गौरव

ऑगस्ट 26, 2025
Untitled 44
संमिश्र वार्ता

३० महिला शेतकऱ्यांनी उच्च दर्जाची हिरवी मिरची पिकवून तब्बल ४० मेट्रिक टन उत्पादनची दुबईला केली निर्यात

ऑगस्ट 26, 2025
1 2 1 1024x682 1
संमिश्र वार्ता

नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ…इतक्या वेळात प्रवास होणार पूर्ण

ऑगस्ट 26, 2025
Corruption Bribe Lach ACB
संमिश्र वार्ता

वीजचोरी, प्रलंबित बिल, नवीन कनेक्शन व ५० हजाराची लाच…बघा, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं

ऑगस्ट 26, 2025
Pic 2 Unveiling of plaque at Epiroc groundbreaking ceremony at Nashik
राष्ट्रीय

एपीरॉकचे भारतात नवे उत्पादन व संशोधन केंद्र…नाशिकमध्ये ३५० कोटी रुपयाच्या प्रकल्पाचे केले भूमिपूजन

ऑगस्ट 26, 2025
img 4
संमिश्र वार्ता

वसई मधील ‘बविआ’च्या माजी नगरसेवकासह अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये….जळगाव जिल्हयातील शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचाही प्रवेश

ऑगस्ट 26, 2025
cbi
राष्ट्रीय

सीबीआयने एक लाख रुपयांची लाच घेतांना हेड कॉन्स्टेबलला केली अटक

ऑगस्ट 26, 2025
Next Post
Untitled 37

ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात या पोलिसांना गमवावी लागली नोकरी….

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011