नवी दिल्ली – आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर १२ फेरीची दमदार सुरुवात झाली आहे. सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आज आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघ विश्वचषकात सहाव्यांदा एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. हा सामना सायंकाळी साडेसात वाजता दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर होणार आहे. विश्वचषकाचे सगळे सामने यूएई आणि ओमान येथे खेळवले जात असले तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय टी-ट्वेंटी विश्वचषकाचे आयोजन करत आहे. आजच्या सामन्यात खेळपट्टी आणि हवामानाची काय स्थिती असेल हे प्रथम जाणून घेऊयात.
हवामानाची स्थिती
दुबईत ऑक्टोबर महिना जास्त उष्ण नसतो. भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान रविवारी हवामान जास्त उष्ण नसेल. आज दुबईमध्ये कमाल तापमान ३४ अंश आणि किमान तापमान २६ अंश असेल. आकाश निरभ्र राहील. पावसाची शक्यता नाही. परंतु सायंकाळी मैदानावर दव पडण्याची शक्यता असल्याने नाणेफेक महत्त्वाची ठरेल.
नाणेफेक ठरणार महत्त्वाची
या मैदानावर आतापर्यंत ६१ टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळविण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रथम फलंदाजी करणार्या संघांनी ३४ आणि नंतर फलंदाजी करणार्या संघानी २६ सामने जिंकले आहेत. आयपीएल २०२१ दरम्यान येथे १३ सामने खेळवले गेले. त्यामध्ये धावांचा पाठलाग करणारे संघांनी सर्वाधिक ९ सामने जिंकले आहेत. तर प्रथम बल्लेबाजी करणार्या संघांनी फक्त ४ सामन्यातच यश मिळविले आहे. सध्या मैदानात पडणारे दव महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत. सराव सामने आणि आयपीएलमध्ये याची प्रचिती आली होती. गवतावर दवबिंदू असल्याने धावांचा पाठलाग करणे सोपे ठरते. त्यामुळे दोन्ही संघ नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडेल.
नाणेफेक महत्त्वाची का?
भारत आणि पाकिस्तानदरम्यान एकदिवसीय आणि टी-ट्वेंटी विश्वचषक असे दोन्ही मिळून १२ सामने झाले आहेत. त्यापैकी भारताने आठ वेळा नाणेफेक जिंकली आहे. भारताने सात वेळा प्रथम फलंदाजी निवडून सामना जिंकला आहे. २००७ च्या विश्वचषक स्पर्धेत झालेल्या गट फेरीचा सामना बरोबरीत सुटला होता. त्या सामन्यातही भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली होती.
दोन्ही संघातील सर्वाधिक धावा – भारतः १९२/५ (अहमदाबाद, २०१२)
दोन्ही संघातील सर्वात कमी धावा – पाकिस्तानः ८३/१० (आशिया चषक, ढाका २०१६)