इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– पॅव्हेलिअन –
ऑस्ट्रेलियन संघासाठी
नागपुरातली संत्री ठरली आंबट….
जागतिक क्रमवारीत कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया संघ जगातला नंबर वन संघ, तर भारतीय संघाचा क्रमांक लागतो दुसरा. मात्र भारतीय संघाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेच्या, नागपुर इथल्या पहिल्याच कसोटीत मात्र अवघ्या अडीच दिवसात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून नंबर वन स्थानावर मिरवणा-या संघाच्या शेपटावर पाय दिल्याने आता या संघाचा तिळपापड झालेला बघायला मिळतोय. यासंदर्भात विश्लेषण करीत आहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक जगदीश देवरे…
कुठल्याशा एका कथेत कोल्ह्याला द्राक्षे तोडता आली नाही नाही म्हणून द्राक्ष आंबट लागल्याचे ऐकले होते. याच धर्तीवर आता, भारतासारख्या नंबर दोनच्या टीमकडून एक डाव आणि १३१ धावा असा दारूण पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला नागपुरातली संत्री देखील आंबट लागली नसेल, तर नवलच म्हणावे लागेल. भारतीय संघाने खेळपट्टी आपल्या गोलंदाजांना उपयोगी पडेल अशी बनविल्याचा आरोप होतोय. क्रिकेटमध्ये असा आरोप पाहुणा संघ नेहमीच करीत असतो. परंतु ज्या खेळपट्टीवर भारतीय बॅटर्सनी ४०० धावा केल्या त्याच खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन धुरधंर फलंदाजानां दोन डावात मिळून देखील ४०० धावा गाठता आल्या नाहीत याचा विचार होणे देखील आवश्यक आहे.
ऑस्ट्रेलियन संघ मॅच सुरू असतांना स्लेजिंग आणि एखादा दौरा सुरू होण्याआधी वाचाळ वक्तव्यांसाठी प्रसिध्द आहे. “आमच्यासारखे आम्हीच” हा त्यांच्या वर्तनातला स्वभाव नेहमीच इतर संघ अनुभवत असतात तसा तो भारतीय संघाने देखील केवळ याचवेळेला नव्हे तर याआधी देखील अनेकदा अनुभवला आहे. परंतु, मायदेशात कसोटी खेळण्याचे अॅडव्हान्टेज आणि रोहीत शर्माच्या नेतृत्वाखाली आखली गेलेली विजयाची रणनिती यामुळे भारतीय संघाला मालिकेतला हा पहिलाच सामना अगदी सहज जिंकता आला. खरेतर, नाणेफेक जिंकण्याचा क्षणैक आनंद सोडला तर या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघासाठी चांगले असे काही घडलेच नाही.
https://twitter.com/BCCI/status/1624339257207984128?s=20&t=m1hEVOaKAIeL33t_cyqF0Q
क्षणिक आनंद हा शब्द यासाठी वापरलाय की, या संघाने अधिकार मिळाला म्हणून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर लगेचच त्यांचे दोन्ही सलामीवर अवघ्या दोन धावा जमलेल्या असतांना बाद होवून डगआउट मध्ये परतले. मग पुढे एकट्या स्मिथचा अपवाद सोडला तर ऑस्ट्रेलियन संघात कुणालाही खेळपट्टीवर पाय रोवून उभे रहाता आले नाही आणि अवघ्या १७७ धावांवर त्यांचा पहिला डाव संपुष्टात आला. भारताने हा सामना जिंकण्याचा पाया रचला तो याच डावात. दुखापतीमूळे सहा मंहिने संघाबाहेर असलेल्या रविंद्र जाडेजाने या डावात ५ बळी घेवून केवळ भारतीय चाहत्यांनाच नव्हे तर ऑस्ट्रेलियन संघाची रणनिती आखणा-यांना देखील आश्चर्यचकीत केले.
पहिल्या डावात भारतीय संघाने आधी कर्णधार रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या आधारावर आणि नंतर अष्टपैलू रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि अक्षर पटेल यांच्या फलंदाजीच्या जोरावर ४०० धावांची भरभक्कम खेळी करून २२३ धावांची मजबुत आघाडी घेतली तेव्हा ख-या अर्थाने ऑस्ट्रेलियन संघाच्या दारूण पराभवाची स्क्रीप्ट लिहीली गेली आणि दुस-या डावात नेहमीप्रमाणे रविचंद्रन अश्चिनच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियन संघाचे फलंदाज अवघ्या ९१ धावात असे काही गळपटले की, तुर्कस्थानमध्ये झालेल्या भुकंपाचे झटके देखील ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी या सामन्यातल्या पराभवापेक्षा हलके वाटले असावेत.
https://twitter.com/BCCI/status/1624331955725815808?s=20&t=m1hEVOaKAIeL33t_cyqF0Q
२०२० साली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौ-यावर गेला होता त्यावेळी अॅडलेडच्या पहिल्याच कसोटीत भारतीय संघ दुस-या डावात अवघ्या ३६ धावांवर बाद झाल्याने ही कसोटी भारतीय संघाने अवघ्या ८ धावांच्या फरकाने गमावली होती. त्या कसोटीत आणि नागपुरच्या कसोटीत देखील जमिन अस्मानाचा फरक बघायला मिळाला. अॅडलेडला जे काही कामी घडलं ते भारतीय संघाची कामगिरी अतिशय चांगली सुरू असतांना घडलं आणि तो पराभव देखील रोमहर्षक ठरला होता. परंतु, इथे मात्र ऑस्ट्रेलियन पराभवाची लक्तरं इतकी वाईट आहेत की पुढे अनेक दिवस ती या संघाला सुईसारखी टोचत रहातील.
अर्थात, या मालिकेतला हा पहिला कसोटी सामना होता याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जागतिक क्रमवारीत आणि कसोटी चॅम्पिअनशिप स्पर्धेत या विजयामुळे भारतीय संघाचा दर्जा गुणतालिकेत उंचावलेला असला तरी अद्याप या मालिकेतल्या उर्वरीत ३ कसोटी सामन्यातसाठी भारतीय संघाला विजयाचे हे टेम्परामेन्ट टिकवून ठेवावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ इतका सहजासहजी पराभव पत्करणारा संघ नाही. यापुढे नागपुरला झालेल्या चुका सुधारून खेळण्याची हिम्मत या संघात आहे आणि तितका दर्जा देखील या संघाकडे आहे.
https://twitter.com/BCCI/status/1624418793832476673?s=20&t=m1hEVOaKAIeL33t_cyqF0Q
India Australia Cricket Test Series Analysis by Jagdish Deore