नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- १५ ऑगस्ट रोजी ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील प्रतिष्ठित लाल किल्ल्यावरून या सोहोळ्याचे नेतृत्व करणार आहे. यावेळी पंतप्रधान राष्ट्रीय ध्वज फडकवतील आणि लाल किल्ल्याच्या बुरुजावरुन देशाला संबोधित करतील. वर्ष २०४७ पर्यंत विकसित भारताची उभारणी करण्याच्या सरकारच्या संकल्पनेला वास्तवात साकार करण्यासाठी देश मोठी झेप घेत असून त्याच अनुषंगाने या वर्षीच्या स्वातंत्र्यदिन सोहोळ्याची ‘नया भारत’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. हा सोहळा समृद्ध, सुरक्षित आणि धाडसी अशा नव्या भारताच्या सातत्यपूर्ण उदयाचे स्मरण करण्याचा मंच म्हणून काम करेल आणि प्रगतीच्या वाटेवर धडाडीने पुढे जाण्यासाठी नवी उर्जा देईल.
पंतप्रधानांचे लाल किल्ला येथे आगमन झाल्यावर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह पंतप्रधानांचे स्वागत करतील.त्यानंतर संरक्षण सचिव दिल्ली क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) लेफ्टनंट जनरल भवनिश कुमार यांची पंतप्रधानांशी ओळख करून देतील. दिल्ली क्षेत्राचे जीओसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलामी स्थानी घेऊन जातील. या ठिकाणी संयुक्त आंतर-सेवा आणि दिल्ली पोलीस जवान पंतप्रधानांना सलामी देतील. त्यानंतर पंतप्रधान मानवंदनेचा स्वीकार करतील.
पंतप्रधानांना मानवंदना देणाऱ्या पथकात यावर्षी ९६ जवानांचा समावेश आहे. (लष्कर, नौदल, हवाई दल तसेच दिल्ली पोलीस यांतील प्रत्येकी एक अधिकारी आणि २४ जवान) यावर्षीच्या स्वातंत्र्यदिन सोहोळ्यासाठी भारतीय हवाई दलाला समन्वयक सेवेचा मान देण्यात आला आहे. मानवंदना स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी लाल किल्ल्याच्या बुरुजाकडे मार्गक्रमण करतील. तेथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, तसेच लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह पंतप्रधानांचे स्वागत करतील. दिल्ली क्षेत्राचे जीओसी ध्वजारोहणासाठी पंतप्रधानांना बुरुजावरील व्यासपीठावर घेऊन जातील.
फ्लाइंग ऑफिसर राशिका शर्मा पंतप्रधानांना राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात मदत करतील. याचवेळी १७२१ फिल्ड बॅटरी मधील शूर जवान २१ तोफांची (उत्सवी) सलामी देतील. पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकवला जात असतानाच, लष्कर, नौदल आणि हवाई दल तसेच दिल्ली पोलीस या दलांतील प्रत्येकी एक अधिकारी आणि इतर श्रेणीचे ३२ जवान अशा एकूण १२८ सैनिकांचा समावेश असलेले राष्ट्रीय ध्वज रक्षक पथक राष्ट्रीय सलामी देईल.
तिरंगा ध्वज फडकवल्यानंतर त्याला ‘राष्ट्रीय सलामी’ दिली जाईल.राष्ट्रीय ध्वज फडकवला जात असताना आणि त्याला ‘राष्ट्रीय सलामी’ दिली जात असताना एक जेसीओ श्रेणीचा अधिकारी आणि इतर श्रेणीचे २५ जवान यांचा समावेश असलेला हवाई दलाचा वाद्यवृंद राष्ट्रगीताची धून वाजवेल. पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर एक राष्ट्रध्वज फडकवणारे हेलिकॉप्टर आणि दुसरे ‘ऑपरेशन सिंदूर’चा ध्वज फडकवणारे हेलिकॉप्टर अशा दोन एमआय-17 हेलिकॉप्टर्समधून कार्यक्रमस्थळी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात येईल. विंग कमांडर विनय पूनिया आणि विंग कमांडर आदित्य जैस्वाल हे या हेलिकॉप्टर्सचे कप्तान असतील.
ऑपरेशन सिंदूर
यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात ऑपरेशन सिंदूरचे यश साजरे केले जाईल. ज्ञानपथ येथील व्ह्यू कटरवर ऑपरेशन सिंदूरचा लोगो असेल. फुलांची सजावट देखील या ऑपरेशनवर आधारित असेल. निमंत्रण पत्रांवर देखील ऑपरेशन सिंदूरचा लोगो आहे. निमंत्रण पत्रांवर चिनाब पुलाचा वॉटरमार्क देखील आहे, जो ‘नया भारत’चा उदय रेखाटतो.
ज्ञानपथ येथे साकारणार ‘नया भारत’
फुलांच्या पाकळ्यांच्या वर्षावानंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतील. त्यांच्या भाषणानंतर राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) छात्र आणि ‘माय भारत’चे स्वयंसेवक राष्ट्रगीत म्हणतील. या सोहळ्यात मुले आणि मुलींचा समावेश असलेले एकूण 2,500 छात्र (लष्कर, नौदल आणि हवाई दल) आणि ‘माय भारत’ स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. हे छात्र आणि ‘माय भारत’ स्वयंसेवक ज्ञानपथावर बुरूजा समोरील भागात बसतील. ते ‘नया भारत’च्या लोगोची रचना साकारतील.
विशेष पाहुणे
लाल किल्ल्यावरील हा सोहळा पाहण्यासाठी यंदा विविध क्षेत्रातील सुमारे पाच हजार विशेष पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये पुढील पाहुण्यांचा समावेश आहे:
विशेष ऑलिंपिक 2025 चे भारतीय पथक
आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे विजेते
खेलो इंडिया पॅरा गेम्सचे सुवर्णपदक विजेते
राष्ट्रीय मधमाशीपालन व मध अभियानांतर्गत प्रशिक्षण व आर्थिक मदत लाभलेले उत्कृष्ट कामगिरी करणारे शेतकरी
औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन योजनेंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारे शेतकरी
ई-निगोशिएबल वेअरहाऊस पावतीसाठी क्रेडिट गॅरंटी योजनेअंतर्गत कर्ज घेतलेले उत्कृष्ट कामगिरी करणारे शेतकरी, व्यापारी/ सहकारी संस्था
हागणदारीमुक्त प्लस गावांचे उत्कृष्ट कामगिरी करणारे सरपंच
कॅच द रेन अभियानाचे उत्कृष्ट कामगिरी करणारे सरपंच
पीएम युवा (युवा लेखक मार्गदर्शन योजना) अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारे युवा लेखक
पीएम-विकास योजने अंतर्गत कौशल्य विकास आणि प्रशिक्षण लाभलेले सर्वोत्तम कामगिरी करणारे युवक
ट्रायफेड (TRIFED) तर्फे पीएम वनधन योजने अंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणारे उद्योजक
राष्ट्रीय एससी/एसटी हब योजनेअंतर्गत अनुसूचित जाती/जमाती समाजातील सर्वोत्तम कामगिरी करणारे उद्योजक
पीएम-दक्ष (PM-DAKSH), श्रेयस (SHREYAS) आणि श्रेष्ठ (SHRESTA) योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारे विद्यार्थी
विश्वास (VISVAS) योजने अंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणारे बचत गट
एनएसटीएफडीसी (NSTFDC) मधील सर्वोत्तम कामगिरी करणारे उद्योजक
सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे पीएसीएस (PACS)
पीएम इंटर्नशिप योजनेतील सर्वोत्तम कामगिरी करणारे इंटर्न
सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे माय भारत स्वयंसेवक
पीएम आवास योजना ग्रामीणचे लाभार्थी
ऑनलाइन / ऑफलाइन क्विझ / स्पर्धांचे विजेते ठरलेले दिल्ली मधील शालेय विद्यार्थी
स्वच्छता अभियानातील उत्कृष्ट कामगिरी करणारे 50 स्वच्छता कार्यकर्ते
लखपती दीदी च्या लाभार्थी
अंगणवाडी सेविका/मदतनीस, पर्यवेक्षिका, बालविकास प्रकल्प अधिकारी, बालसंगोपन संस्था, मिशन शक्ती
पुनर्वसित वेठबिगार, सुटका केलेल्या आणि पुनर्वसित महिला आणि बालक
आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये सहभागी झालेले स्वयंसेवक / प्रशिक्षक
केंद्र/राज्य शासनाच्या कोणत्याही एका समाजकल्याण योजनेला पूर्णत्वाला नेणारे सरपंच/ग्रामनेते
व्हायब्रंट व्हिलेजमधील पाहुणे
गेल्या वर्षभरात राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत स्थापन झालेले बचत गट
इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्समधील नवोन्मेशी/ उद्योजक
अंदमान आणि निकोबार बेटांवरील मूळ समुदायातील आदिवासी मुले
विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधून पारंपरिक वेशभूषेत आलेल्या 1,500 हून अधिक लोकांनाही या भव्य सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
सार्वजनिक सुविधा
क्लोकरूम सुविधा
हेल्पडेस्कवर स्वयंसेवकांची नियुक्ती
व्हीलचेअरची सुविधा
अतिरिक्त वाहनतळाची सुविधा
मेट्रो सेवा: नागरिकांना कार्यक्रमस्थळी सहज पोहोचता यावे यासाठी, 15 ऑगस्ट रोजी मेट्रो सेवा पहाटे 4 वाजल्यापासून कार्यरत राहील.
स्पर्धा
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर, संरक्षण मंत्रालयाने ‘मायगव्ह’ च्या सहकार्याने विविध प्रश्नमंजुषा आणि स्पर्धांचे आयोजन केले आहे. स्पर्धांचे तपशील पुढीलप्रमाणे:
ज्ञानपथवरील आकृतिबंध स्पर्धा
‘ऑपरेशन सिंदूर – दहशतवादाविरुद्ध भारताचे धोरण पुनर्भाषित करणे’ या विषयावर निबंध स्पर्धा
रील स्पर्धा: भारतीय स्वातंत्र्याशी संबंधित स्मारके/स्थळांना भेट
‘नवभारत – सशक्त भारत’ या विषयावर चित्रकला स्पर्धा
ऑनलाइन प्रश्नमंजुषांची मालिका:
नवभारत घडवण्यात महिलांची भूमिका
भारत रणभूमी: भारताची सीमा
राष्ट्रीय सुरक्षेत आत्मनिर्भर नवकल्पनांचा उदय
सुमारे 1,000 विजेते या सोहळ्यात सहभागी होतील.
लष्करी बँड सादरीकरणे
नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यासाठी आणि ‘ऑपरेशन सिंदूर’च्या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी, स्वातंत्र्यदिनाच्या सायंकालीन कार्यक्रमांमध्ये प्रथमच देशभरात अनेक बँड सादरीकरणांचे आयोजन केले जाणार आहे.