मुंबई – प्राप्तिकर विभागाने चार मालमत्ता पुनर्रचना कंपन्यांवर (एआरसी ) छापे टाकत जप्तीची कारवाई केली आहे. मुंबई, अहमदाबाद, दिल्ली इत्यादी ठिकाणी असेलल्या एकूण 60 ठिकाणांचा यात समावेश आहे. या कारवाईत एकूण ४ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात याप्रकरणी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कर्ज देणाऱ्या बँकांकडून अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) मिळवण्यासाठी मालमत्ता पुनर्रचना कंपन्यांनी विविध अयोग्य आणि फसव्या व्यापार पद्धतींचा अवलंब केला होता, असे या कारवाईतून समोर आले आहे. कर्ज घेणारा गट आणि मालमत्ता पुनर्रचना कंपन्या यांच्यात या प्रक्रियेमध्ये एक अयोग्य प्रकारे संगनमत होते , यासाठी बनावट संस्थांचा वापर करण्यात आला. मालमत्ता पुनर्रचना कंपन्यांनी ज्या किंमतीत अनुत्पादित मालमत्ता मिळवली ती रक्कम कर्जासाठी तारण ठेवलेल्या वास्तविक मूल्यापेक्षा खूपच कमी असल्याचे आढळून आले आहे.
शोध मोहिमेदरम्यान 4 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. प्राप्तिकर आणि संबंधित कायद्यांतर्गत झालेले उल्लंघन शोधण्यासाठी जप्त केलेल्या मोठ्या प्रमाणातील कागदपत्रांचे आणि डिजिटल पुराव्यांचे विश्लेषण केले जात आहे. पुढील तपास सुरू आहे.