मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हेवी वॉटर बोर्डाने (HWB) भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्र (BARC) यांच्या सहकार्याने आयोडीन – सल्फर (I-S) प्रक्रियेवर आधारित पाण्याच्या थर्मो-केमिकल अर्थात आण्विक रासायनिक विभाजनातून हायड्रोजन निर्मितीच्या प्रात्यक्षिक प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरू केले आहे. हा प्रकल्प भारताच्या स्वच्छ आणि हरित भविष्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. मुंबईतील चेंबूर येथे हेवी वॉटर बोर्ड सुविधा (Heavy Water Board Facilities – HWBF) केंद्राच्या परिसरातील, राष्ट्रीय रसायने आणि खते मर्यादितच्या (Rashtriya Chemicals and Fertilizers – RCF) आवारात हा अभिनव प्रकल्प उभारला जात आहे. हा प्रकल्प भारताला हायड्रोजन-आधारित ऊर्जा प्रणालीकडे नेण्याच्या वाटचालीतला हे एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
अणुऊर्जा विभागाचे (Department of Atomic Energy – DAE) सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे (Atomic Energy Commission – AEC) अध्यक्ष डॉ. अजित कुमार मोहंती, भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्राचे संचालक विवेक भासीन, हेवी वॉटर बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस. सत्यकुमार, तसेच राष्ट्रीय रसायने आणि खते मर्यादितचे (RCF) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस. सी. मुडगेरीकर यांच्यासह या सर्व आस्थापनांमधील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अणुऊर्जा विभागाचे (Department of Atomic Energy – DAE) सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे (Atomic Energy Commission – AEC) अध्यक्ष डॉ. अजित कुमार मोहंती यांनी उपस्थितांना संबोधित केले. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असून, यातून आयोडीन-सल्फर प्रक्रियेची क्षमता दिसून येणार आहे, रासायनिक प्रक्रिया चक्राअंतर्गत उष्णतेचा वापर करून पाण्याचे विभाजन करण्याची ही नवी पद्धत असल्याचे त्यांनी सांगितले. या पद्धतीसोबत अणुऊर्जेची सांगड घातल्यास हे नवे तंत्रज्ञान हायड्रोजन उत्पादनासाठी एक कार्यक्षम आणि शाश्वत उपाय ठरू शकणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हायड्रोजनमध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता असून, त्यातले उत्सर्जनाचे प्रमाणही शून्य आहे, त्यामुळेच हायड्रोजन हा जीवाश्म इंधनाचा एक आशादायी पर्याय म्हणून उदयाला आला आहे. त्याचवेळी आयोडीन-सल्फर प्रक्रिया ही हायड्रोजन उत्पादनासाठी एक पर्यावरणाला अनुकूल, मोठ्या व्याप्तीत राबवता येणारी प्रक्रिया ठरू शकणार आहे, आणि यातून वाहने आणि उद्योग क्षेत्रासाठी स्वच्छ उर्जा उपलब्ध होऊ शकते.
या महत्त्वाकांक्षी प्रात्यक्षिक प्रकल्पाच्या उभारणीमुळे भारताने हायड्रोजन ऊर्जा निर्मितीसंबंधीच्या नवोन्मेषात आघाडीवर असेलेल्या देशांमध्ये स्थान मिळवले आहे. या क्षेत्रात सातत्यपूर्ण पद्धतीने होत असलेले संशोधन आणि विकासामुळे देशातले कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्यावर आणणे देशाला उर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवण्याची उद्दिष्टे गाठण्यात मोठी मदत होणार आहे.