नवी दिल्ली – कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची छोटी-मोठी भांडणे होतात. तसेच कॉलेज निवडणूक काळात तर हे वाद थोडे विकोपालाही जातात, नंतर मिटतात. परंतु दिल्लीतील एका कॉलेजमध्ये दोन गटातील हे वाद थेट गँगवारपर्यंत पोहोचले. या प्रकरणामुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली असून पोलिसांना गोळीबार करावा लागला.
दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात नेहमीप्रमाणे खटल्यांची सुनावणी सुरू होती. त्याचवेळी अचानक वकिलाच्या वेशात आलेल्या दोन गुंडांनी खतरनाक गुन्हेगार जितेंद्र गोगी याच्यावर गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर देत पोलिसांनी दोन्ही गुंडांना ठार केले. या गोळीबारात एक वकीलही जखमी झाला. तसेच दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने भितीचे वातावरण पसरले आहे. ही भयानक घटना प्रत्यक्षात टोळी युद्धाचा परिणाम आहे. कारण गोगी आणि टिल्लू ताजपुरीया यांच्या दोन टोळींमध्ये बराच काळापासून संघर्ष सुरू आहे.
पोलिसांचे म्हणणे आहे की, टिल्लू ताजपुरीया आणि जितेंद्र गोगी यांचे कॉलेजच्या दिवसांपासून वैर होते. पूर्वी एकावेळी हे दोघे जवळचे मित्र होते, पण २०१० मध्ये दिल्लीतील एका कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत ते एकमेकांचे शत्रू बनले. एवढेच नाही तर २०१८ मध्ये दोघांच्या टोळीमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. त्यानंतर दिल्लीतील बुरारी भागात झालेल्या टोळीयुद्धात ३ जण ठार तर ५ जण जखमी झाले.
असे म्हटले जाते की, या दोन टोळ्यांमधील रक्तरंजित संघर्षात आतापर्यंत सुमारे १०० लोक मारले गेले आहेत. तसेच रोहिणी न्यायालयात झालेल्या गोळीबारात ठार झालेला गँगस्टर जितेंद्र गोगी हा दिल्ली-हरियाणा सीमेला लागून असलेल्या अलीपूर भागातील रहिवासी होता. एकेकाळी तो दिल्ली पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर होता. याशिवाय, तिहार जेलमधूनच दुबईच्या व्यावसायिकाकडून ५ कोटी रुपयांची मागणी केल्यामुळे तो चर्चेत होता. गोगीचा इतका धाक होता की, तो तुरुंगातूनही खंडणी, अपहरण, खून यासारखे गुन्हे करत असे. तो तीन वेळा पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला होता.
जितेंद्र गोगी प्रमाणे टिल्लू ताजपुरीया सुद्धा एक भयानक गुन्हेगार आहे. तो सध्या तिहार जेलमध्ये असून तिथून आपली टोळी चालवतो. दोन टोळ्यांमधील युद्ध सुमारे ११ वर्षांपासून सुरू झाले, आता नीतू दाबोडिया ही पोलीस चकमकीत मारली गेली. याशिवाय स्वतःला दिल्लीचा डॉन म्हणवणाऱ्या नीरज बवनियालाही पोलिसांनी अटक करून तुरुंगात डांबले. यानंतर, अशा प्रकारे टोळी युद्धाचे हे शेवटचे प्रकरण बंद करण्यात आले आहे. मात्र त्यामुळे आता न्यायालयाच्या सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.