मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेले दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे दहावी, बारावीसह सर्व परीक्षा घेण्याबाबत संकट उभे राहिले होते. बऱ्याचशा परीक्षा ऑनलाइन घेण्यावर भर दिला जात होता. आता मात्र कोरोनाचे सावट कमी झाले असल्याने यंदा परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात येत आहेत. सर्व विद्यापीठांच्या परीक्षांचाही यात समावेश आहे.
राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी परीक्षांबाबत माहिती दिली आहे. कोरोनामध्ये सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. संसर्गाची भीती असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये येऊ देणे टाळले जात होते. आता मात्र कोरोनाचा संसर्ग दूर झाला असल्याने आणि लसीकरणही मोठ्या प्रमाणात झाले असल्याने परीक्षा प्रत्यक्षरित्या म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन वर्षांनंतर परीक्षा प्रत्यक्ष होणार असल्याने वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यास वेळ कमी पडू नये, लिखाणास पुरेसा वेळ मिळावा म्हणून दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये जसे प्रयत्न केले गेले तसेच प्रयत्न विद्यापीठांच्या परीक्षांमध्येही करण्यात येत आहे.
दोन वर्ष ऑफलाइन परीक्षांची सवय नसल्याने यावर्षीही परीक्षा ऑनलाइन माध्यमातून घेण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. त्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात आले. ऑफलाइन परीक्षांना या आंदोलनातून विरोध करण्यात आला. या आंदोलनाचा विचार करुन परीक्षांमध्येही सवलतही देण्यात आली होती. आता मात्र ऑनलाइन परीक्षा घेण्याचे काही कारणच नसल्याने ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाकी आहेत त्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये येऊनच द्यावी लागणार आहे.
दोन वर्ष निकाल लागण्यातही काहीसा उशिर झाला होता. त्याचा परिणाम प्रवेश प्रक्रियांवर दिसून आला. यंदा मात्र परीक्षा वेळेत झाल्याने आणि इतर परीक्षाही वेळापत्रकानुसार होत असल्याने निकालही लवकर लागणार आहे.