विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
गेल्या महिन्याभरात अफगाणिस्तानमधील घडामोडींकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. विशेषत : तालिबानी राजवटीने सत्ता हस्तगत केल्यानंतर अनेक देशांनी अफगाणिस्तान बाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपला शेजारी देश असल्याने भारताने देखील येथील घडामोडींबाबत चिंता व्यक्त केली आहे. यापुढे अफगाणिस्तानात बाबत भारताची काय रणनीती राहील, यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली, या बैठकीत दहशतवादाला विरोध, मानवतावादी धोरणासह विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा करण्यात आल्याचे समजते.
तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून भारत अफगाणमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीत गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, संरक्षण प्रमुख जनरल बिपीन रावत आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल सहभागी झाले होते.
दरम्यान, भारत सरकारने आधीच स्पष्ट केले आहे की, अफगाणिस्तान संबंधीची मुख्य चिंता म्हणजे अफगाणिस्तानच्या कोणत्याही भूभागाचा दहशतवाद किंवा भारतविरोधी कारवायांसाठी वापरू नये याची दक्षता घेतली जाईल. तसेच दुसरी चिंता म्हणजे अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या संपूर्ण भारतीय नागरिकांच्या सुरक्षित परत येण्याबाबतची आहे. या प्रश्रांसंदर्भात कतारमधील भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी तालिबानच्या सांगण्यानुसार ३१ ऑगस्ट रोजी दोहा येथील भारतीय दूतावासात कतारमधील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे उपप्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टँकझाई यांची भेट घेतली तेव्हा भारताने हा मुद्दा तालिबानांसोबत उपस्थित केला होता. त्याच वेळी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीचे अधिकृत माहिती मिळाली नाही, तरीही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे कळते की, तालिबानमधील सद्य परिस्थितीवर ही बैठक केंद्रित होती. भारत हा शांतताप्रिय देश असून त्याचे शेजारी राष्ट्रांसंबंधी नेहमीच सहकार्य आणि सहिष्णूतेचे धोरण राहिले आहे, परंतु भारतविरोधी कारवाया करणाऱ्या कोणत्याही शक्तीला भारताकडून चोख उत्तर दिले जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले
तिकडे पंजशीर प्रांतात विरोधी गटांवर कथित विजय मिळवल्यानंतर तालिबान्यांनी जवळजवळ संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतला आहे. मात्र, पंजशीरच्या विरोधी नेत्यांनी तालिबानचा दावा फेटाळून लावला आहे. दरम्यान, तालिबानविरोधी पंजशीरच्या नेत्यांनी दावा केला आहे की, पाकिस्तानच्या हल्ल्यात त्यांचाही सहभाग आहे. त्याच वेळी पाकिस्तानची इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सची प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद हे काबूलमध्ये होते.