नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरातील वाहतुकीच्या उपाययोजना न करताच नाशिक शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याचा घेतला जात असलेला निर्णय हा वाहतूक क्षेत्रासोबतच नाशिकच्या उद्योग क्षेत्रासाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे शासनाने प्रथमत: शहरात वाहतुकीच्या उपाययोजना करव्यात, ट्रक टर्मिनलचे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ उपाध्यक्ष पी.एम.सैनी यांनी केली आहे.
याबाबत नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दादाजी भुसे, जिल्हाधिकारी गंगाथरण डी., आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज आहिरे, राहुल ढिकले, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, मनपा आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक शहर व परिसरात निर्माण होत असलेल्या वाहतुकीच्या समस्येमुळे नाशिक शहरात अवजड वाहतुकीस बंदी घालण्याची चर्चा होत आहे. उपाययोजना करण्याऐवजी अवजड वाहतूक बंद करण्याचा जो निर्णय घेतला गेला तर तो निर्णय नाशिकच्या उद्योगासाठी तसेच ट्रान्सपोर्ट क्षेत्रासाठी अन्यायकारक असा निर्णय असल्याचे म्हटले आहे.
नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन ही वाहतूकदार व उद्योजक यांच्यात समन्वय साधणारी आणि सामाजिक जबाबदारी म्हणून समाजासाठी काम करणारी संस्था आहे. संस्थेच्या वतीने नाशिक शहरातील वाहतुकीच्या प्रश्नांवर उपाययोजना म्हणुन आणि शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व अपघात कमी करण्यासाठी नाशिक शहराच्या चारही दिशांना आणि औद्योगिक वसाहतीत ट्रक टर्मिनल विकसित करण्यात यावे अशी वारंवार मागणी करत आहे. तसेच शहरातील वाहतुकीचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने रिंग रोड विकसित करून आहे त्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी करत आहे. या उपाययोजना न करता शासकीय यंत्रणेकडून अवजड वाहतूक बंद करण्याची चर्चा नाशिकच्या विकासाला खीळ बसणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून नाशिक शहरातील वाहतूक बेटांचा अभ्यास करण्यात आला. यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सपर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत अनेक महत्वपूर्ण अशा उपाययोजना विद्यार्थ्यांनी सुचविल्या आहे. या स्पर्धेत अनेक तज्ज्ञांनी देखील सहभाग नोंदविला. त्यांनीही या स्पर्धेतील विद्यार्थ्यांनी सुचविल्या या उपाययोजना अतिशय प्रभावी असल्याचे सांगितले आहे. प्रशासनाने या सर्व उपाययोजना अंमलात आणल्या तर नक्कीच नाशिकच्या वाहतुकीचे प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे त्या स्विकरव्यात अशी मागणी संघटनेने केलेली आहे.
संघटनेने वारंवार शहराच्या विकासाच्या दृष्टीने सामाजिक बांधिलकी जपत योगदान दिले आहे. तसेच अविरतपणे कामही सुरू आहे. परंतु प्रशासनाकडून नेहमीच वाहतूकदारांच्या विरोधात भूमिका घेण्यात आली. नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने प्रशासनाची ही भूमिका अतिशय चुकीची आहे. आपण योग्य वाहतुकीच्या उपाययोजना कराव्यात त्यासाठी अवजड वाहतूक बंद करणे हा पर्याय ठरू शकत नाही. त्यामुळे संघटनेच्या मागणीचा सकारात्मक विचार करावा अन्यथा संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल त्यामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देखील त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.
Heavy Traffic Banned Nashik city