अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनमाडसह त्याच्या आजूबाजूच्या परिसरात सतत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. काल रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावल्या नंतर आज सकाळ पासून दिवसभर विश्रांती घेतलेल्या वरून राजाने संध्याकाळच्या सुमारास मनमाड लागत असलेल्या कातरवाडी शिवारात संध्याकाळच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. जोरदार पाऊस झाल्याने कातरवाडी-रापली दरम्यान असलेला पाझर तलाव भरून गेला. शेतकरी भगवान झाल्टे यांच्या शेतात पाणी साचले. सध्या अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मक्याची पेरणी केली आहे. मात्र शेतात असेच पाणी तुंबून राहिले आणि पावसाने थोडी उघडीप दिली नाही तर मक्याचे नुकसान होईल. या पिकाला आलेली कोंब खराब होईल किंवा जी थोडी फार उगवलेली आहे ती खराब होण्याची भीती शेतकरी झाल्टे यांनी व्यक्त केली आहे. पण, दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून मनमाड शहरासह पडत असलेल्या जोरदार पावसाने जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याबरोबरच आटलेल्या विहिरींना पाणी उतरण्यास मदत होणार आहे.