माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
१-उद्या सोमवार दि. २४ मार्चपासून महाराष्ट्रातील अवकाळी पावसाचे वातावरण निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे रब्बी पीक काढणी दरम्यानचा अवकाळी पावसापासूनचा नुकसाणीचा धोका टळू शकतो, असे वाटते.
२-सध्याची तापमाने-
मागील आठवडयात ३-४ दिवस एकाकी झालेल्या दिवसाच्या कमाल तापमान वाढीतून उष्णतेमुळे कांदा गहू सारख्या रब्बी पिकावर विपरित परिणाम जाणवला. परंतु अवकाळीच्या ह्या वातावरणामुळे लगेचच २-३ डिग्रीने घसरलेल्या कमाल व किमान तापमानामुळे पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
सध्या दिवसाचे कमाल तापमान, कोकणात ३०-३२ तर उर्वरित महाराष्ट्रात ३६ डिग्री दरम्यान आणि किमान तापमान हे १८-२० डिग्री दरम्यान जाणवत आहे. ही दोन्हीही तापमाने सरासरी इतक्याच श्रेणीत आहे. ही जमेची बाजू समजावी.
३-पुढील तापमानाची शक्यता काय ?
कमाल तापमानात वाढीची शक्यता जरी वर्तवली जात असली तरी पुढील १०-१२ दिवस म्हणजे गुढीपाडवा व त्यानंतरही २ ते ३ दिवस म्हणजे साधारण बुधवार दि. २ एप्रिलपर्यन्त कमाल व किमान तापमाने ही महाराष्ट्रात सरासरीच्या खाली असण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे पिकांना मदतच होईल, असे वाटते. शिवाय उभ्या असलेल्या रब्बी पिकांचा, गत ६०-६५ दिवसाचा अवकाळी व गारपिटीचा धोक्याचा काळही निभावला आहे, असे समजू या !
४-एप्रिलच्या पहिल्या आठवडयात अवकाळीची शक्यता जाणवते काय ?
कमकुवत ‘ला-निना’ व तटस्थ ‘आयओडी’ ह्या स्थितित जरी सध्या काहीही बदल जाणवत नसला तरी ‘एमजेओ’ ची सायकल, एप्रिलच्या पहिल्या आठवडयात, भारत महासागरीय परीक्षेत्रात प्रवेश करण्याच्या शक्यतेमुळे त्याच्या परिणामातून काय वातावरणीय बदल घडून येतील हे त्याचवेळी लघुपल्ल्याच्या अंदाजात कळून येईल. मार्चअखेरीस ह्याचाही खुलासा होवू शकतो असे वाटते.
जागतिक हवामान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.