माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
१- अवकाळी व गारपीट –
परवा मंगळवार दि १८ मार्च ला दिलेला अंदाज कायम असुन त्याच बरोबर विदर्भातील अकरा जिल्ह्यात आज गुरुवार ते रविवार दि. २० ते २३ मार्च दरम्यानच्या चार दिवसात अवकाळी वातावरणाचा परिणाम जाणवेल, असे वाटते. विशेषतः विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ तसेंच मराठवाड्यातील नांदेड अश्या आठ जिल्ह्यात गुरुवार ते शनिवार दि. २० ते २२ मार्च दरम्यान अवकाळी बरोबर गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
२-मध्य महाराष्ट्रात अवकाळीचा धोका नाही काय?
मध्य महाराष्ट्रातील खांदेश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात सध्या जरी अवकाळीचा परिणाम नसला तरी रविवार दि. २३ ते मंगळवार दि. २५ मार्च दरम्यानच्या तीन दिवस ढगाळ वातावरणच राहून झालाच तर अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
पावसापेक्षा विजा, वारा व गडगडाटी सारख्या अवकाळी वातावरणाची शक्यता अधिक जाणवते. गारपीटीची शक्यता मात्र ह्या १० जिल्ह्यात जाणवणार नाही, असे वाटते.
३-उष्णतेची लाट नाही.-
आज दि. २० ते २४ मार्च दरम्यानच्या पाच दिवसात, कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात दिवसाच्या दुपारच्या कमाल तापमानात काहीशी घट होवून तापमान सध्यापेक्षा २-३ डिग्रीने कमाल तापमान घटण्याची शक्यता असुन महाराष्ट्रात कोठेही सध्या उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही. मुंबईसह कोकणातील सात जिल्ह्यात मात्र सध्या असलेल्या तापमानात विशेष बदल न होता, कायम राहील,
असे वाटते.
४-वातावरणातील सध्याचा बदल कश्यामुळे?
बं. उपसागारातील ९०० मीटर उंचीपर्यंतच्या प्रत्यावर्ती चक्रीय वारे व म. प्रदेशाच्या नैरूक्त भागात १५०० मीटर उंचीपर्यंतच्या आवर्ती चक्रीय वारे अश्या दोन्हीही वाऱ्यांचा विदर्भादरम्यान होणाऱ्या संगमातून ऊबदार बाष्पाचा अवकाशात उरध्वगमन होवून उंचावरील थंडाव्यातून सांद्रीभवनातून उष्णतेच्या संवहनी क्रियेद्वारे अवकाळी पाऊस व गारपीटीची शक्यता निर्माण झाली आहे.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune