विशेष प्रतिनिधी, हरिद्वार
देशभरात कोरोनाने घातलेले थैमान आणि येथील तिसऱ्या शाहीस्नानानंतर कोलमडून पडलेल्या आरोग्य व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर साधू संतांच्या प्रमुख आखाड्यांनी हरिद्वार कुंभमेळा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या तेराही आखाड्यांचा समावेश असलेल्या अखिल भारतीय आखाडा परिषदेची बैठक होत असून त्यात औपचारिक घोषणा होणार आहे. तशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
स्थगितीबाबतचे वृत्त सर्वप्रथम इंडिया दर्पणने दिले आणि त्यानंतर महाराष्ट्रासह देशातील प्रमुख वृत्तपत्रांनी सकाळपासून डिजिटल आवृत्त्यांमध्ये बातम्या देऊन चिंता व्यक्त केली होती. कुंभमेळा स्थगितीबाबत निर्णय शासनाने घ्यावा की आखाडा परिषदेने याबाबत दिवसभर साधूंमध्ये चर्चा होत राहिल्या. अखेर आज सायंकाळी शैवांच्या श्रीनिरंजनी आखाड्याची बैठक मन्सादेवीचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्रपुरीजी महाराज आणि पंच यांच्या अध्यक्षतेखाली झाली. देशातील कोरोना उद्रेक पाहता, केवळ शाहीस्नानाच्या परंपरेला चिकटून राहणे योग्य नाही. साधू महंत आणि धर्ममार्तंडांनी धर्म-प्रजेचे हित अगोदर पाहिले पाहिजे, असा चर्चेचा सूर होता. उद्या देवतांना नैवेद्य दाखवून आखाड्याचे साधू परततील. अशाच प्रकारचा निर्णय आनंद आणि महानिर्वाणी आखाड्याने घेतला असून त्यांचे साधू देखील उद्या हरिद्वार सोडतील. दरम्यान, अटल आखाड्याच्या साधुंनी आज सायंकाळीच हरिद्वार सोडले आहे.
