त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुराणातील अवतारी पुरुष असो की, इतिहासातील एखादा महापुरुष यांच्या जन्मतिथी किंवा जन्मस्थळावरून वाद होणे ही भारतात नवीन गोष्ट राहिलेली नाही, अनेक ठिकाणी असे वाद आपल्याला आढळून येतात. विशेषतः रामायण काळातील अंजनीसूत हनुमान यांच्या बद्दल सर्व भारतीयांना धार्मिक आदर वाटतो. हनुमानाचा जन्म कुठे झाला याबाबत आता पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे.
कर्नाटकातील किष्किंधा हनुमान जन्मभूमी असल्याचा दावा किष्किंधाचे महंत गोविंदानंद यांनी केला आहे. वाल्मिकी रामायणाचा दाखला देत त्यांनी हा दावा केला आहे. इतकेच नव्हे तर महंत गोविंद दास त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले असून अंजनेरी हनुमान जन्मभूमी असल्याचे सिद्ध करण्याचे आव्हान त्यांनी नाशिकच्या संत महंतांना दिले आहे. हनुमानाचे जन्मस्थळ अंजनेरी असल्याचा दावा किष्किंधाचे महंत गोविंदानंद यांनी फेटाळून लावला आहे. हनुमान जन्मभूमीवर शास्त्रार्थ आणि वादविवाद करण्यासाठी महंत गोविंदानंद त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले आहेत.
हनुमानाचे जन्मस्थळ किष्किंधा आहे आणि जन्मस्थळाच्या संदर्भात कुठलीही चर्चा करण्यास तयार आहे. खरे म्हणजे नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर नजिक अंजनेरी डोंगरावर हनुमानासोबतच अंजनी मातेचेही एक मंदिर आहे. या डोंगरावर हनुमानाचा जन्म झाल्याचे सांगण्यात येते. पण किष्किंधा येथेच हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
हनुमान एकनिष्ठ रामभक्त, रामसेवक होते असंही मानलं जातं त्यामुळे हिंदुधर्मीयांमध्ये हनुमानाला देवाचं स्थान प्राप्त आहे. हनुमानाची आणि श्रीरामाची भेट सीतेच्या अपहरणानंतर झाली. नाशिककरांचा विश्वास असा आहे की, सीतेच हरण नाशिकमधून झाले. श्रीराम, लक्ष्मण, सीता हे तिघे नाशिकमधल्या पंचवटीत राहात होते. इथेच काळाराम मंदिर आहे, सीतागुंफा आहे, आणि जटायू-रामाची भेट झाली ते टाकेद क्षेत्रही इथेच आहे. इतकेच नव्हे तर लक्ष्मणाने शुर्पणखेचं नाक इथेच कापले म्हणून या गावाला ‘नासिक’ असे या गावाला ( ठिकाणाला ) नाव पडले. म्हणून हनुमानाचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या अंजनेरी येथे झाला असे नाशिकच नाही, महाराष्ट्रातल्या नागरिकांची श्रद्धा आहे. कारण की, राम-सीता-लक्ष्मण नाशिकमधल्या पंचवटीत राहात होते, तर हनुमानाचा जन्म इथल्या अंजनेरी डोंगरावर झाला आहे.
दरम्यान, महंत गोविंदानंद यांचे आव्हान नाशिकचे पुरोहित आणि महंत स्विकारणार की यापुढील काळात हा वाद वाढतच जातो का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.