मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे ‘राज्य ग्राहक हेल्पलाईन‘ हे ३१ मार्च २०२५ रोजी मध्यान्हानंतर बरखास्त करून ” मध्ये विलीन करण्यात येत आहे. या हेल्पलाइनकडे राज्यातील सर्व ग्राहकांनी १ एप्रिल २०२५ पासून आपल्या समस्या व तक्रारी मांडाव्यात, अशी जाहीर सूचना कक्ष अधिकारी ईशा पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
राज्यात “कंझ्युमर गाईडन्स सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई” या संस्थेच्या मदतीने “राज्य ग्राहक हेल्पलाईन” ची २१ ऑक्टोबर २०१० च्या शासन निर्णयान्वये सुरु करण्यात आली होती. उपभोक्ता मामले विभाग, भारत सरकार यांच्या सुचनेनुसार, २६ मार्च २०२५ रोजीच्या शासननिर्णय क्र. संकिर्ण-२०२५/प्र.क्र१०/ग्रासं-२ अन्वये “राज्य ग्राहक हेल्पलाईन” ही ३१ मार्च २०२५ मध्यान्हानंतर पासून बरखास्त करुन “राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन” मध्ये विलिन करण्यात आली आहे. तरी, राज्यातील सर्व ग्राहकांस विनंती आहे की, १ एप्रिल, २०२५ पासून सर्व ग्राहकांनी आपल्या समस्या व तक्रारी “राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन” कडे मांडाव्यात.
याकरीता पुढील माध्यमांचा वापर करावा. ई-मेल आय डी: nch-ca@gov.in, टोल फ्री क्रमांकः १८००११४००० किंवा १९१५ (सार्वजनिक सुट्टया सोडुन इतर सर्व दिवशी -सकाळी ०८:०० ते रात्री ०८:००), https://consumerhelpline.gov.in/user/signup.php या वेब पोर्टलद्वारे, एसएमएस तसेच व्हाट्सअपद्वारे ८८००००१९१५ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच NCH APP द्वारे, ग्राहक UMANG APP द्वारे आपल्या तक्रारींची नोंद करु शकतात, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.