मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पार गोदावरी एकात्मिक नदी जोड योजना राबविण्यासाठी आज जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ,अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ,आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार पंकज भुजबळ, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दिपक कपूर, सचिव डॉ. संजय बेलसरे, नाशिक विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे अधीक्षक अभियंता शिंगाडे इत्यादी उपस्थित होते.
पार तापी नर्मदा हा आंतरराज्य प्रकल्प रद्द करून घेतल्यामुळे नार पार खोऱ्यातील शिल्लक ९. ७६ टीएमसी आणि उपसा सिंचन योजना क्रमांक ३ आणि ४ चे ३ टीएमसी हे सर्व पाणी एकत्रीत करून पार- गोदावरी हा एकात्मिक नदी जोड प्रकल्प राबवण्याची मागणी आहे. हे पाणी दिंडोरी-चांदवड-येवला आणि संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर-गंगापूर या दुष्काळी भागात नेण्यासाठी पायाभुत सुविधा आपण मांजरपाडा योजनेच्या माध्यमातून आधीच करून ठेवल्या आहे.मांजरपाडा प्रकल्प मार्गे पार गोदावरीचे पाणी पुणेगाव धरणातून पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याद्वारे आपण दिंडोरी-चांदवड-येवला आणि संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर-गंगापूर या दुष्काळी भागात नेले जाणार आहे.
दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड प्रकल्पाच्या प्रशासकिय मान्यतेमध्ये तांत्रिक सुधारणा करून एकदरे धरणाचे पाणी वाघाड, करंजवण, ओझरखेड व तिसगाव धरणात वळण्याची भुजबळ आणि नरहरी झिरवाळ यांनी यावेळी मागणी केली.
एकदरे धरणाचे पाणी वाघाड धरणातून मराठवाड्याला जाणार आहे.त्या पाण्यातील काही पाणी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, चांदवड, येवला, नांदगाव व निफाड तालुक्यांतील अति दुष्काळी भागातील गावांना दिल्यास या भागातील पिण्याच्या, शेतीच्या व औद्योगिकीकरणाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणे शक्य आहे. त्याकरिता वाघाड धरणात येणाऱ्या पाण्यामधून काही पाणी कॅनॉल द्वारे करंजवण धरणात आणल्यास करंजवण ओझरखेड तिसगाव ही धरणे एकमेकांना लिंक केल्यास करंजवण, ओझरखेड व तिसगाव ही धरणे एकदरे धरणातील अतिरिक्त पाण्याने भरले जातील. याप्रकारे करंजवण ओझरखेड, तिसगाव धरणाची पाण्याची तुट कायमस्वरूपी भरून निघेल अशी मागणी छगन भुजबळ आणि नरहरी झिरवाळ यांनी केली.