नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गोदावरी नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, जलपर्णी आणि पानवेलीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नदीचे प्रवाह थांबले आहेत. परिणामी, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह धार्मिक विधींसाठीही शुद्ध पाणी मिळणे कठीण झाले आहे. दशक्रिया विधीसाठी आलेल्या कुटुंबीयांना देखील पाणी उपलब्ध नसल्याने गोदाकाठच्या अनेक सरपंचांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना गोदाकाठच्या सरपंचांच्या वतीने निवेदन देण्यात आले. येत्या दहा दिवसात जलपर्णी मुक्त गोदावरी नदी झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दशक्रिया विधी करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी प्रशासनाकडून वारंवार घोषणाबाजी केली जाते,मात्र प्रत्यक्षात उपाययोजना होत नसल्याने संतप्त सरपंचांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने निवेदन स्वीकारले असून लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. मात्र, जर लवकर निर्णय झाला नाही तर गोदाकाठच्या सरपंचांनी अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. या प्रसंगी चांदोरी सरपंच विनायक खरात,संदीप कातकडे सायखेडा सरपंच,प्रिया पेखळे ओढा सरपंच,खंडू पाटील बोडके करंजगाव माजी सरपंच,अरुण दुशिंग एकलहरे सरपंच, भूषण मटकरी,संजय शेळके,सागर गडाख,प्रकाश ढेमसे,दौलत टर्ले आदी उपस्थित होते.
गोदाकाठचा आरोग्य प्रश्न गंभीर
प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गोदाकाठचा आरोग्य प्रश्न गंभीर झाला आहे. नदीत पूजेसाठी आणि अंतिम संस्कारासाठी आलेल्या नागरिकांना जलपर्णीमुळे त्रास सहन करावा लागतो. हा प्रश्न तत्काळ सोडवला गेला नाही तर आम्ही आंदोलनाशिवाय पर्याय ठेवणार नाही.
प्रिया पेखळे, सरपंच ओढा
ठोस पाऊल उचलले जात नाही
गोदावरी नदीला गंगाजल म्हणून ओळखले जाते. मात्र, आज हीच गंगा जलपर्णीच्या विळख्यात अडकली आहे.आम्ही सरकारला वारंवार उपाययोजना करण्याची विनंती करत आहोत,मात्र कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नाही.
संदीप कातकाडे, सरपंच सायखेडा
गोदाकाठ स्वच्छ ठेवणे आवश्यक
सर्वसामान्य नागरिक आणि धार्मिक विधींसाठी येणाऱ्या भाविकांसाठी गोदाकाठ स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. मात्र, प्रशासनाची उदासीनता लक्षात आंदोलना शिवाय पर्याय नाही.
सागर गडाख, आपत्ती व्यवस्थापन समिती, चांदोरी