इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या लग्नसमारंभ सुरू आहेत. या सोहळ्यात विविध प्रकारच्या घटना घडतात. काही किरकोळ असतात तर काही भलत्याच भारी असतात. त्यामुळेच काही घटना थेट पोलिस स्टेशन पर्यंत जाऊन पोहचतात. छत्तीसगडमध्ये अशीच एक घटना घडली आहे.
कोरबा येथून एका वराची मिरवणूक निघणार होती, पण तो मंडपाऐवजी थेट लॉकअपमध्ये गेला. याचे कारण म्हणजे प्रेयसीची फसवणूक करून दुसऱ्या तरुणीशी लग्न केल्याचा परिणाम आहे. त्यामुळे पोलिसांनी या तरुणाला अटक करून थेट कारागृहात रवानगी केली आहे.
जलसो गावातील २६ वर्षीय चिरंजीवी वर्मा याचे रामपूर परिसरात राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघेही दोन वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत होते. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंधही ठेवल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान त्याचे लग्न अन्यत्र निश्चित झाल्याने त्याने दुसऱ्या मुलीशी तत्काळ लग्न करण्याचा निर्णय घेतला.
चिरंजीवी वर्मा याची लग्नाची मिरवणूक निघणार होती. याच दरम्यान त्याच्या मैत्रिणीला त्याच्या लग्नाची माहिती मिळाली. तिने थेट आरोपीच्या वधूच्या घरी जाऊन या आरोपीची हकीकत सांगितली. तिने सांगितले की, आरोपीने तिला लग्नाचे वचन दिले होते. खोटे आश्वासन देऊन तो तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता. त्यानंतर जेव्हा वधूला हे सत्य कळले तेव्हा तिनेही लग्नास नकार दिला आणि लग्न मोडले. दरम्यान, आरोपीच्या प्रेयसीने तरुणाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी तरुणाला अटक केली.