इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिकचे पालकमंत्रीपद हे गिरीश महाजन यांच्याकडे राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. तर रायगडचा तिढा उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी एकत्र बसून सोडावावा असे दिल्लीतून सांगण्यात आल्याचे वृत्त आहे.
गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही पालकमंत्रीपदावरुन महायुतीत मोठा वाद सुरु होता. हा वाद दिल्ली दरबारी गेला. त्यानंतर महाकुंभमेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्रीपद हे गिरीश महाजन यांच्याकडे राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आल्याचे बोलले जात आहे.तर रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद महायुतीच्या दोन्ही घटक पक्षाच्यां नेत्यांवर सोडण्यात आला आहे.
१८ जानेवारीला राज्याच्या पालकमंत्रीपदाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर रायगड व नाशिकचा वाद पेटला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही पदाला स्थगिती दिली होती. या स्थगितीमुळे शिंदे गटाचे नेते नाराज होते. रायगडमध्ये शिंदे गटाचे भरत गोगावले आणि नाशिकमध्ये दादा भुसे हे नाराज असल्याचे बोलले जात होते. पण, आता या वादावर दिल्ली दरबारी तोडगा काढण्यात आला असून त्यात शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.