मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागांतील एकूण १७२ पर्यटक अडकलेले असल्याची माहिती नागरिक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA) आणि संबंधित यंत्रणेकडून प्राप्त झाली आहे. सर्व प्रवासी सुखरूप असून त्यापैकी १७१ पर्यटकाशी संपर्क झाला असून ते सुरक्षित ठिकाणी आहेत. उर्वरीत १ पर्यटक श्रीमती. कृतिका जैन यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे उत्तराखंडमध्ये काल दाखल झाले असून त्यांनी विविध ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून शासनाकडून करण्यात येत असलेल्या उपायोजनाची माहिती दिली. तसेच परिसरातील रस्ते देखील पुर्वरत सुरू करून त्याद्वारे नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रस्ते विकास विभाग श्री अजय तमता यांची देखील मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेऊन याबाबत त्यांच्याशी संवाद साधला आहे. राज्य शासनाकडून सर्व महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
एकुण १७१ पर्यटकांपैकी ८८ पर्यटक (३१ मातली, ६ जॉली ग्रॅन्ट तसेच ५२ उत्तरकाशी) येथे सुखरुप आहेत. सुरक्षित पर्यटकांनी त्याच्या नियोजित कार्यक्रमानुसार पुढील वाटचाल सुरु केली आहे. उर्वरित ८३ पर्यटक गंगोत्री येथे सुरक्षित असुन त्यांना एअर लिफ्ट करुन ITBP Camp Matali येथे हलविण्यात येणार आहे.
राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष (SEOC), महाराष्ट्र हे SEOC उत्तराखंड, जिल्हा नियंत्रण कक्ष, DEOC उत्तरकाशी, आणि राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद केंद्र (NERC) नवी दिल्ली यांच्याशी सातत्याने संपर्कात आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे, परिस्थितीवर लक्ष ठेवुन आहेत.
मा. गिरीश महाजन, मंत्री (आपत्ती व्यवस्थापन तथा जलसंपदा), महाराष्ट्र राज्य स्वतः उत्तराखंड येथे घटनास्थळी दाखल झाले असून, शोध व बचावकार्यासाठी दिशानिर्देश देत असून पर्यटकांना सुखरूप स्थळी पोहचविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. व स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने त्यासंबंधी उपाय योजना राज्य शासनाकडून राबवल्या जात आहेत.
संचालक (आपत्ती व्यवस्थापन) उत्तराखंड यांचेकडून संचालक (आपत्ती व्यवस्थापन) मंत्रालय, मुंबई यांना प्राप्त झालेल्या अहवालानुसार बचाव कार्यासाठी आज खालीप्रमाणे उपाययोजना केली जाणार आहे.
१) सर्व पर्यटकांना हेलीकॉप्टरच्या मदतीने हर्षल हेलीपेंड येथून ITBP Camp Matali व जॉली ग्रॅन्ट येथे आणण्यात येत आहे.
२) गंगोत्री ते हर्षील हेलीपॅड यांचे दरम्यान यात्रेकरुंच्या सुरक्षीततेसाठी १० आयटीबीपी टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत. प्रत्येक टीम ३० यात्रेकरूंना संरक्षण देणार आहे.
लष्कर, NDRF, SDRF आणि स्थानिक बचाव पथक घराली येथे कार्यरत आहेत. संपर्क यंत्रणा व रस्ते अद्याप पूर्ववत झालेले नाहीत. संपर्क व रस्ते पायाभूत सुविधा पूर्ववत करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत.NERC नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हवाई बचाव कार्य सुरू झाले असून त्यांचे स्थलांतर अपेक्षित आहे. उत्तराखंडमध्ये आपत्ती बचाव कार्यासाठी जबाबदार अधिकारी श्री. राजीव स्वरूप, IGP यांच्याद्वारे उपग्रह फोन (Satellite Phone) तैनात करण्यात आले असून लष्कराच्या छोट्या सॉर्टी सुरू आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र हे बचाव कार्यासाठी आवश्यक समन्वय, माहिती अद्ययावत करणे आणि संबंधित कुटुंबीयांना मदत पुरविण्यासाठी कार्यरत आहे.