मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवरून ठेवला असून गणेशोत्सवासाठी सर्वत्र जोरदार आणि जय्यत तयारी करण्यात येत आहे. ‘गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात ‘ गणरायाचे स्वागत व आगमन होणार असून यासाठी तरुणांमध्ये जल्लोष दिसून येते आहे. मात्र त्याचबरोबर शाळा कॉलेजला देखील या दिवसांमध्ये सुट्टी मिळावी निदान पाच दिवस तरी सुट्टी द्यावी, अशी मागणी काही विद्यार्थी संघटनांनी केली आहे
साधारणतः दोन वर्षांच्या मोठया कालावधीनंतर कोरोना महामारीचे संकट दूर झाल्यामुळे शासनाने हटविलेल्या निर्बंधांमुळे यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवात सर्व शाळा व महाविद्यालयांना ५ दिवस सुट्टी जाहीर करावी तसेच या काळात कोणत्याही परीक्षा अथवा प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येऊ नये अशा प्रकारच्या सूचना सर्व शाळांच्या व्यवस्थापनांना करण्याची मागणी अनेक विद्यार्थी संघटनांनी शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे.
मुंबईतील उपसंचालक विभागाकडे यासंदर्भातील अनेक निवेदने आल्याने मुंबई उपसंचालक संदीप संगवे यांनी तत्काळ सर्व शाळांना उत्सवकाळात सुट्ट्यांबाबत शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात येतील असे स्पष्ट केले आहे. गणेशोत्सवासाठी ठाणे, मुंबई परिसरातील पालक-विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोकणासह राज्यातील आपल्या गावी जात असतात. त्यामुळे मुलांनाही गावाकडे जावे लागते, मात्र त्यांची शाळा बुडते, त्यामुळेच शाळांना सुट्टी देण्यात यावी अशी मागणी होत आहे
दुसरीकडे मात्र, या दरम्यान कॉन्व्हेन्ट शाळा जाणूनबुजून शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतात. शाळांना पाच दिवसांची सुट्टी दिली जाते, परंतु परतीच्या प्रवासाला गर्दी होत असल्यामुळे तातडीने परतणे शक्य होत नाही. त्यामुळे तेव्हा कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेऊ नयेत, असे निवेदन युवासेना सिनेट सदस्य यांनी शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांना दिले. यावर कार्यवाहीचे निर्देश देऊन परीक्षा न घेण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सावंत यांनी दिली.
तसेच यासंदर्भातील निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना प्रमुख संघटक चेतन पेडणेकर यांनीही दिले आहे. अकरावी प्रवेशाची प्रक्रिया पुढे ढकला अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा स्पेशल राऊंड गणेशोत्सवानंतर सुरू करा, या मागणीसाठी शिक्षक भारतीकडून शिक्षण संचालकांना पत्र पाठविले आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे.
त्याचप्रमाणे शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य यांच्या परिपत्रकानुसार अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा स्पेशल राऊंड १ चे प्रवेश दिनांक ३० ऑगस्टपासून २ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांनी पूर्ण करावेत, असे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा स्पेशल राऊंड गणेशोत्सवानंतर होणे आवश्यक आहे, असे मोरे यांनी सांगितले.
Ganeshotsav School Education Leave Exam Demand