इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेना- मनसेच्या युतीची चर्चा सुरु असतांनाच आज शिवसेना नेते गजानन कीर्तीकर यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी आता राज आणि उध्दव यांनी एकत्र येण्याचा स्टँड घेतला आहे. तो चांगला आहे. पण, बाळासाहेबांची कडवट आणि भव्य शिवसेना महाराष्ट्रात अवतरायची असेल तर एकनाथ शिंदे यांना सुद्दा यांच्यासोबत यायला हवेत असे माझे मत असल्याचे त्यांनी सांगितले. राज ठाकरे, उध्दव ठाकरे, एकनाथ शिंदे या तिघांनी आले तर भक्कम शिवसेना दिसेल. ते पुढे म्हणाले की बाळासाहेबांबद्दल मनात आपुलकी असेल आणि त्यांनी निश्चय केला तर होऊ शकेल. शिवसैनिकांसाठी, महाराष्ट्रासाठी ते गरजेचं आहे असेही ते म्हणाले.
शुक्रवारी उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होणार, आता संकेत देणार नाही, थोड्या दिवसात बातमीच देतो असे थेट विधान केले. शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातही कोणताही संभ्रम नाही असे ते म्हणाले होते. त्यानंतर आज सामनामध्ये मोठी बातमी आली. त्यात राज व उध्दव ठाकरे यांचा जुना फोटोही छापण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून मनसे – शिवसेना युतीबाबत सकारात्मक विधाने येत आहेत. त्यात अनेकांचे सूचक वक्तव्यही समोर आले. पण, त्यावर थेट चर्चा होत नाही. काल उध्दव ठाकरे यांनी युतीसंबधी जे बारकावे असतील त्यावर आम्ही काय करायचे ते पाहू असेही ते म्हणाले. या विधानावर मनसे नेते अविनाश देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली. ज्यावेळी आमच्याकडे युतीचा ठोस प्रस्ताव येईल त्यावेळी त्यावर राज ठाकरे निर्णय घेतील. तर संदीप देशपांडे यांनी सांगितले की ते काय बातमी देणार याची वाट पाहू.
एकुणच या सर्व चर्चेनंतर गजानन कीर्तीकर यांनी हे विधान केले आहे.