नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारत-बांगलादेश सीमेची एकूण लांबी 4096.7 किलोमीटर इतकी असून त्यापैकी 3232.218 किलोमीटर क्षेत्रावर कुंपण घालण्यात आले आहे.
सीमांचे रक्षण करण्याकरता सीमेलगत कुंपण घालणे हा एक अतिशय महत्वाचा सुरक्षा उपाय आहे. कुंपण घालण्यामुळे सीमा पार गुन्हेगारी कारवाया, तस्करी, गुन्हेगारांचा संचार आणि शस्त्रास्त्रांची तस्करी इत्यादी आव्हाने प्रभावीपणे हाताळून सीमाभाग गुन्हेगारीमुक्त राखण्यात मदत होते. सीमेवरील सुरक्षेच्या उपाययोजनांसंदर्भात कुंपण घालण्यासह, भारत दोन्ही सरकारांमधील आणि दोन्ही देशांच्या सीमा सुरक्षा दलांमधील सर्व प्रोटोकॉल आणि करारांचे पालन करेल असे बांगलादेश सरकारला कळवण्यात आले आहे. बांगलादेशच्या वतीने याआधीच्या सर्व नियमांची अंमलबजावणी केली जाईल तसेच सीमेपलीकडील गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी सहकार्यपूर्ण दृष्टिकोन बाळगला जाईल अशी भारताची अपेक्षा असल्याचे देखील बांगलादेश सरकारला कळवण्यात आले आहे.
भारत-बांग्लादेश सीमेलगत अद्याप 864.482 किलोमीटर लांबीचे कुंपण घालायचे असून यामध्ये 174.514 किलोमीटर लांबीच्या अव्यवहार्य टप्प्याचा समावेश आहे. कुंपण घालण्याचा प्रकल्प पूर्ण करताना भू संपादन, बॉर्डर गार्ड बांगलादेशने घेतलेल्या हरकती आणि आक्षेप, कामासाठी आवश्यक मर्यादित हंगाम आणि भूस्खलन/दलदलीच्या जमिनीशी संबंधित आव्हानांना सामोरे जावे लागते. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.