अजय सोनवणे
मालेगाव – नैसिर्गिक संकट आणि अनेक आव्हाने पार करून शेतकरी कष्टाने पीक घेतो. परंतु त्याच पिकाचे नुकसान झाल्यावर शेतकरी हवालदिल आणि हतबल होतो. जिल्ह्यातील शेतकरीसुद्धा अशाच परिस्थितीतून जात आहे. उन्हाळ कांदा चाळीत भरुन ठेवल्याने आता चांगला भाव मिळण्याची अपेक्षा उत्पादकांना आहे. एकीकडे कांद्याचे भाव कोसळत आहेत आणि त्यातच तालुक्यातील एका शेतकऱ्याचे तब्बल ८० हजार रुपयांचे कांद्याचे नुकसान झाले आहे.
लोणवाडे शिवारातील एका शेतकऱ्याने सर्व आव्हानांना तोंड देत कष्टाने कांदा पिकवला. पण बाजारात कांद्याचे भाव घसरल्याने तो चाळीत साठवून ठेवला. या कांद्यावर अज्ञाताने युरिया मिश्रीत पाणी टाकल्याने कांद्याचे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीबद्दल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी शेतकऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार भुसे (सोयगाव, मालेगाव) या कांदा उत्पादक शेतकऱ्याची लोणवाडे शिवारात शेत आहे. त्यांनी या वर्षी कांद्याचे पिक घेतले आहे. परंतु बाजार समितीत कांद्याचे भाव घसरल्यामुळे त्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला होता. या कांद्यावर अज्ञात व्यक्तीने युरियामिश्रीत पाणी टाकल्यामुळे संपूर्ण कांदा सडू लागला आहे. भुसे यांनी त्वरित मालेगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणाची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
शेतकरी काबाडकष्ट करून शेतात धान्य पिकवतो. नैसर्गिक आपत्तीमुळे आणि समाजातील असामाजिक तत्वांमुळे शेतकऱ्यांचे अशा प्रकारचे नुकसान होते. अशा तत्वांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.