नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– स्पर्धा परीक्षेसाठी अवघ्या दोन मिनिटं उशिरा पोहोचल्यामुळे एका महिला उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. या घटनेमुळे विद्यार्थी व पालकवर्गात तीव्र नाराजी पसरली असून प्रशासनाच्या आडमुठे धोरणाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आयुक्तालयांतर्गत उच्च श्रेणी लघुलेखक पदासाठी स्पर्धा परीक्षा १२ मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती. उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर ८:३० वाजेपर्यंत हजर राहावे अशा सूचना देण्यात आल्या होत्या.सदर परीक्षा राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी स्कूल कॅम्पस, मोहनलाल चोपडा विद्यानगरी, आर्टिलरी सेंटर रोड, नाशिक रोड येथे घेण्यात आली. परीक्षेचे वेळापत्रक सकाळी ९ ते ११ असे होते.
संबंधित महिला उमेदवार या सिन्नर येथील असून त्या सकाळी ८:३२ वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचल्या. मात्र प्रवेशद्वार आधीच बंद करण्यात आला होता. परीक्षा अधिकाऱ्यांकडे विनंती करूनही तिला केंद्रात प्रवेश देण्यात आला नाही. उमेदवाराने सांगितले की, परीक्षा केंद्रावर वाहतूक कोंडीमुळे दोन मिनिटं उशिरा पोहोचली, मात्र प्रशासनाने कोणतीही सहानुभूती न दाखवता परीक्षा हॉलमध्ये प्रवेश नाकारला.
या घटनेमुळे इतर परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी हा निर्णय धक्कादायक असून, प्रशासनाच्या आडमुठे धोरणावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.घटनेनंतर विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. “फक्त दोन मिनिटं उशिरा पोहोचल्याने परीक्षेपासून वंचित राहणे हा अन्याय आहे,” असे अनेक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. प्रशासनाच्या या कठोर निर्णयाविरोधात सोशल मीडियावरही नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, समाज कल्याण आयुक्तांकडे या संदर्भात प्रतिक्रिया मागितली असता, त्यांनी कोणताही स्पष्ट प्रतिसाद दिला नाही. विद्यार्थ्यांनी आता शासनाकडे याबाबत तक्रार करण्याची तयारी केली आहे.
ही घटना परीक्षेतील नियमांची कठोर अंमलबजावणी दाखवते, पण मानवीय दृष्टिकोनाचा अभाव असल्याचाही आरोप होत आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी परीक्षा धोरणांबाबत फेरविचार होण्याची गरज असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
परीक्षा आयोजकांकडून अनेक चुका
मला परीक्षा केंद्रावर येण्यास अवघे पाच मिनिट उशीर झाला. दुसऱ्या एका विद्यार्थिनीला चार मिनिटं तर तिसऱ्या एका मुलीला केवळ दोन मिनिटं उशीर झाला. आम्ही सर्वांनी प्रवेशद्वारावर विनंती केली.परंतु आमचे म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही. परीक्षेला बसून देण्यात आले नाही. तसे पाहता परिक्षा ९ वाजता सुरू होणार होती. यापूर्वी परीक्षा आयोजकांकडून अनेक चुका झाल्या आहेत. परंतु त्यावर मत दंडात्मक कारवाई झालेली नाही.
तेजस्विनी पिंगळे, परीक्षार्थी