इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – छोट्या पडद्यावरील मालिकांना आणि पर्यायाने त्यातील कलाकारांना प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळते. सध्या छोट्या पडद्यावर अनेक दिग्गज कलाकार झळकत आहेत. झी मराठी वाहिनीवर सध्या ‘तू चाल पुढं’ ही मालिका तुफान गाजत आहे. या मालिकेतील प्रमुख भूमिकेत असलेले दोन्ही कलाकार म्हणजेच दीपा चौधरी, आदित्य वैद्य हे खूप वर्षांनी पुन्हा मनोरंजन विश्वात परतले आहेत. मात्र तरीही प्रेक्षकांकडून या मालिकेला मिळालेल्या प्रेमाने अभिनेता आदित्य वैद्य भारावला आहे.
मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार सध्या छोट्या पडद्याकडे परतताना दिसत आहेत. प्रेक्षकांसाठी देखील ही पर्वणी आहे. ‘झी मराठी’वरील ‘तू चाल पुढं’ ही मालिका एका वेगळ्या धाटणीची असल्याने ती अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. १५ ऑगस्ट रोजी ही मालिका सुरू झाली. मालिकेत अश्विनी म्हणजेच दीपा चौधरी ही नायिकेच्या भूमिकेत असून अभिनेता आदित्य वैद्य हा श्रेयस वाघमारे म्हणजेच अश्विनीच्या नवऱ्याची भूमिका साकारत आहे. दोन्ही कलाकारांनी खूप वर्षांनंतर मनोरंजन विश्वात पुन्हा कमबॅक केलं आहे.
अश्विनीप्रमाणेच मालिकेत मुख्य भूमिकेत असलेल्या श्रेयस वाघमारे अर्थात आदित्य वैद्याचीही भूमिका प्रेक्षकांना भलतीच आवडली आहे. श्रेयस हा स्वतःच्या विश्वात जगणारा, अहंकारी, थोडा अडेल असला तरी त्याचं अश्विनी, मुली, आई – वडील, बहिणीवर खूप प्रेम आहे.
स्वतःच घर घेण्याची त्याला फारच इच्छा आहे. वारंगकडील काम सोडल्यानंतर आता स्वतःच्या व्यवसायातून त्याने घरासाठी खूप उलाढाल करून जागा खरेदी केली. मात्र त्यात अडचण निर्माण झाल्याने तो विचित्र वागत आहे. मालिकेला साजेशी भूमिका आदित्य वैद्यने निभावल्यामुळे तो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
https://twitter.com/zeemarathi/status/1590347224960991233?s=20&t=TL4khlGFJI6n9Uj8OGyOMg
१९९८ पासून आदित्य मनोरंजन विश्वात काम करत आहे. या काळात अनेक भूमिका मी केल्या. आता एका मोठ्या ब्रेकनंतर मला ही मालिका मिळाली. नुसती मालिका नाही तर त्यातील टीम आणि झी सारख्या मोठ्या वाहिनीवर काम करायची संधी मिळाली ही भावना मनाला सुखावणारी आणि आनंद देणारी असल्याचे आदित्यने सांगितले आहे. आदित्य पुढे म्हणाला की श्रेयस हे पात्र थोड वेगळं आहे. तो कसाही असला तरी त्याचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. बायकोवर प्रेम असलं तरी त्याचा स्वभाव थोडा वेगळा आहे. बाकी काहीही असो पण श्रेयसचे पात्र करत असताना मला खूप भारी वाटतं. ही भूमिका मलाच खूप आवडल्याचे त्याने सांगितले आहे.
जरा काही सुरळीत सुरू आहे असं वाटत असतानाच मालिकेत आता एक मोठं वळण आल आहे. श्रेयसने घेतलेल्या जागेत अडचण निर्माण झाली आहे. तर कामाचे पैसे त्याने जागेत गुंतवल्याने अडचणी वाढल्या आहेत. या मालिकेत धनश्री कडगावकरसह देवेंद्र दोडके, प्रतिभा गोरेगावकर यांसारखे ज्येष्ठ कलाकार देखील आहेत. विविध संकट येत असताना वाघमारे कुटुंब त्याला कसं सामोर जाईल, आणि अश्विनी पुढे आता काय वाढून ठेवलं आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Entertainment Tu Chal Pudha Serial Actor Says