सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्रद्धा सबनीस यांची मुलाखत
नाशिक: पोटदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, केस गळणे, थकवा, अशक्तपणा, वजन वाढणे अशी लक्षणे महिलांमध्ये जाणवतात, तर या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांशी बोलून त्यावर उपाय करणे आवश्यक आहे. कारण छोट्या छोट्या लक्षणांमधून बऱ्याचदा मोठा आजार होऊ शकतो. त्यामुळे कंटाळा न करता स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे ही प्रत्येक स्त्रीचे पहिले कर्तव्य आहे, असे मत सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्रध्दा सबनीस यांनी व्यक्त केले. जागतिक महिला आरोग्य दिनाच्या निमित्ताने इंडिया दर्पण फेसबुक लाइव्ह मध्ये त्या बोलत होत्या. बागेश्री पारनेरकर हिने मुलाखत घेतली. पुढे त्या म्हणाल्या की, अनेकदा महिलांमध्ये हिमोग्लोबिन, लोह कमी असते त्यामुळे ऍनिमिया हा आजार महिलांमध्ये आढळतो. भारतीय महिला आपल्या कुटुंबाची पूर्ण काळजी घेतात पण स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करतात. पुढे मोठा काही आजार होण्यापेक्षा आधीच काळजी घेणे गरजेचे आहे.
मासिक पाळीच्या समस्यांविषयी त्यांनी सांगितले की, सध्याच्या जीवनशैलीनुसार मासिक पाळी लवकर येते. पूर्वी १३ ते १४ वयोगटात यायची तर आता हा काळ १० ते ११ वर्ष वयोगट असा आहे पण हे नॉर्मल आहे. पण त्यानंतर जर मासिक पाळी अनियमित असेल किंवा खूप जास्त रक्त जात असेल तर डॉक्टरांशी बोलणे आवश्यक आहे. हल्ली PCOS आणि PCOD या आजारांच प्रमाण वाढले आहे. यात अनेकदा मासिक पाळी अनियमित येणे, वजन वाढणे, चेहऱ्यावर केस येणे अशी लक्षणे दिसतात. त्यासाठी योग्य व्यायाम, आहार असणे गरजेचे आहे. तसेच हार्मोनल असंतुलनामुळे महिलांमध्ये थायरॉईडच प्रमाणही खूप आहे. अनेकदा महिला आपलं शेड्युल बदलतात, म्हणजे कधी फिरायला जातात, कधी योगा तर कधी झुंबा करतात तर ते एकसारखं ठेवलं पाहिजे. थेरपी मध्ये सतत बदल करतात. त्यामुळे हार्मोन्स संतुलित राहत नाही. म्हणून जीवनशैलीत बदल न करता योग्य आहार, व्यायाम, झोपण्याच्या योग्य वेळा याकडे लक्ष दिले पाहिजे.
मेनापॉज हा एक प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येणारा महत्त्वाचा काळ आहे. या काळात अनेकदा चिडचिडेपणा, डिप्रेशन, विसरणे, हाडांची झीज होणे, छाती किंवा चेहऱ्यावर गर्मी जाणवते. अशावेळी घरच्यांनी पण समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी भरपूर पाणी पिणे, सात्विक जेवण, कॅल्शियम लोहयुक्त आहार यावर भर दिला पाहिजे. रोजच्या जेवणात हिरवी पालेभाजी, उसळी, फळे, सुकामेवा यांचा समावेश करावा. आजकाल मानसिक ताण सगळ्यांना जाणवतो. त्यासाठी वेळेचे नियोजन महत्त्वाचे आहे. स्ट्रेस योग्य रीतीने हाताळता आला पाहिजे. असे त्यांनी सांगितले. वयाच्या ३० नंतर संपूर्ण टेस्ट करून घेतल्या पाहिजे. ज्यात कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन डी, इ, बी १२, थायरॉईड या तपासण्या वेळेच्या वेळी केल्या पाहिजे. ४० नंतर मॅमोग्राफी, सोनोग्राफी करून घेतली पाहिजे. अनेकदा गर्भाशय, ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असतो. पण योग्य वेळी काळजी घेतली तर हे धोके टाळता येतात. काहीही त्रास होत नसेल तरी या तपासण्या केल्याचं पाहिजे.