नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उत्तर महाराष्ट्राचे हक्काचे रुग्णालय असणाऱ्या सह्याद्री हॉस्पिटल, नाशिक येथे रोबोटिक तंत्राद्वारे ३०० गुडघेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून उतारवयात गुडघेदुखीने त्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी हे तंत्रज्ञान अतिशय उपयोगी ठरत आहे. येथे कार्यरत असणारे रोबोटिक सांधेरोपणतज्ञ डॉ.प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली अल्पावधीतच इतक्या यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया करणारे सह्याद्री हॉस्पिटल हे उत्तर महाराष्ट्रातील पहिलेच रुग्णालय ठरले आहे.
या विषयी माहिती देताना, डॉ.प्रकाश पाटील म्हणाले, “पारंपारिक शस्त्रक्रियेपेक्षा रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया ही अधिक अचूक असल्याने गुडघ्यातील नैसर्गिक रचनांचे जतन तर होतेच त्याशिवाय उत्तम प्रकारे ‘नी कायनेमॅटिक अलाइनमेंट’ साधल्याने नैसर्गिक हालचालीच्या मध्येही सहजता व सुलभता येते. कमीतकमी रक्तस्त्राव, छोटी जखम, कमीतकमी वेळेत होणारी शस्त्रक्रिया आणि जलद रिकव्हरी मुळे शस्त्रक्रियेपश्चात काही तासातच रुग्णांना चालणेदेखील शक्य होते. रुग्णांना होणाऱ्या वेदनांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी असते आणि भविष्यात ते अगदी नैसर्गिक सांध्याप्रमाणे नियमित हालचाल करू शकतात.”
वयोमानानुसार गुडघ्यांची झीज होते. वाढत्या गुडघ्याच्या त्रासामुळे अनेकदा हालचाल कमी होते त्यामुळे स्थूलता, मधुमेह रक्तदाब असे अनेक आजारदेखील उद्भवू शकतात. अशावेळेस कृत्रिम गुडघा लावण्याशिवाय इतर कुठलाही पर्याय शिल्लक रहात नाही. परंतु रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे केली जाणारी गुडघे रोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यास गुडघा बदलल्यानंतर देखील अशा वयोवृद्ध माणसांना सहजतेने नियमित जीवनशैली जगता येते.
सह्याद्री हॉस्पिटल हे उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रणी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल असून येथे सांधेरोपण शस्त्रक्रियांबाबत जनजागृती करण्याचे काम गेली अनेक वर्ष चालू आहे. या हॉस्पिटल मध्ये बसविण्यात आलेला हा रोबोट अद्ययावत असून यामुळे ऑपरेशन मध्ये डॉक्टरांना अचूकता साधण्यास मदत होते अशी माहिती वरिष्ठ उपाध्यक्ष संजय चावला यांनी दिली.